नवीन रेल्वे लाईन्सचे काम पूर्ण होताच सर्व समस्यांचे निराकरण होईल – धरम वीर मीना

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच, राजुरा
वरोरा – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना हे १४ फेब्रुवारी रोजी येथील रेल्वे स्थानकाची पाहणी करत असताना आमदार करण देवतळे आणि वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांनी त्यांच्या समक्ष रेल्वेच्या असुविधांचा पाढा वाचून शक्य तितक्या लवकर सुविधा पुरविण्याची जोरकसपणे मागणी केली. त्यावर नवीन रेल्वे लाईन्सचे काम पूर्ण होताच सर्व समस्यांचे निराकरण होईल, असे मीना यांनी आश्वस्त केले.
मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर असुविधा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची ओरड प्रवाशांनी सुरू केली होती. याबाबतच्या तक्रारीही रेल्वे प्रशासनाकडे सादर करण्यात आल्या होत्या. याची दखल घेऊन रेल्वे स्थानकावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे हेतूने महाव्यवस्थापक धरम वीर मीना यांनी वरोरा रेल्वे स्थानकाला 14 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भेट दिली. यावेळी वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अन्य पदाधिकारी सर्वश्री सुधीर खापने, मारोतराव मगरे,जगदीश तोटावार, शाहिद अख्तर, विजय वैद्य, गजानन उमरे, संजय राम, रेल्वे सल्लागार समितीचे पदाधिकारी गजानन राऊत, राजेश साकुरे, ओम यादव, सुरेश महाजन, विजय मोकाशी, विठ्ल लेडे, युवराज इंगळे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार करण देवतळे आणि रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांनी रेल्वे प्रवासी संघाच्यावतीने बल्लारशाहवरुन मुंबई व पुण्यासाठी दररोज २२/२४ डब्ब्याची सुपर एक्सप्रेस चालविण्यात यावी, कोरोना संक्रमणाच्या टाळेबंदी काळात बंद केलेल्या 16031/16032 अंदमान एक्सप्रेस, 16093 / 16094 लखनौ एक्सप्रेस, 11401 /11402 नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस, 22127 / 22128 आनंदवन एक्सप्रेस, 57135 / 57136 काजीपेठ – नागपूर पसेंजर, बल्लारशाह – मुंबई सेवाग्राम लिंक एक्सप्रेस या गाड्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात ; वरोरा रेल्वे स्थानकावर 12791 / 12792 दानापूर सिकंदराबाद एक्सप्रेस, 12615 /12616 जी. टी एक्सप्रेस, 22645 / 22646 अहिल्यानगरी एक्सप्रेस, 12975 / 12976 जयपूर – म्हैसूर एक्सप्रेस, 12511 / 12512 गोरखपूर – तिरुअनंतपुरम राप्तीसागर एक्सप्रेसचा ,11045 / 11046 धनबाद – कोल्हापूर एक्सप्रेस आणि 12767 / 12768 संतरागाछी अशा ये जा करणाऱ्या एक्सप्रेसचे थांबे देण्यात यावे.
बल्लारशाह – नागपूर, बल्लारशाह – अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस तथा बल्लारशाह – वर्धा दरम्यान जलद लोकल चालविण्यात याव्या, अशा आशयाचे निवेदन महाव्यवस्थापक मीना यांना दिले. कोकणातील रोहा येथे लोकांची मागणी नसतानाही खासदार सुनील तटकरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे 10 एक्सप्रेस गाड्यांचे स्टापेज एकाच वेळी नुकतेच प्रदान करण्यात आले. मात्र, विदर्भाच्या मागास जिल्ह्यातील जनतेने वर्षोनुवर्षे मागणी करुनही रेल्वे प्रशासनाकडून त्याची साधी दखल घेतली जात नसल्याची खंत मीना यांना बोलून दाखवली गेली. यावर येत्या काही महिन्यात तिसरी लाईन सुरू होईल तेव्हा सर्व समस्यांचे निराकरण होईल, असे राजकीय थाटणीतील आश्वासन मीना यांनी दिले.
आमदार करण देवतळे यांनीही प्रवासी संघाच्या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शवून स्वतंत्र निवेदन देत एक्सप्रेस गाड्या थांब्याची मागणी रेटून धरली. सोबतच सध्या दहावी – बारावीची परीक्षा बघता बंद केलेला रेल्वे पुलाचा मार्ग तात्काळ सुरू करण्यात यावा, अशी मागणी आमदार करण देवतळे यांनी करताच महाव्यवस्थापक मीना यांनी ती तात्काळ मान्य केली. यावेळी मध्य रेल्वे मुंबईचे सहा. महाव्यवस्थापक के.के. मिश्र, मध्य रेल्वे नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग, पीसीसीएम अरविंद मालखेडे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक ( वाणिज्य) अमन मित्तल, सिनिअर डीओएम के. पाटील, सहा. वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप प्रसाद, खंड वाणिज्य निरीक्षक मंगेश तितरमारे, एसीएम संजय मुले, धरमसिंग मीना, चंद्रपूर थाना आरपीएफ निरीक्षक क्रिष्णानंद रॉय, वरोरा स्टेशन मास्टर चेतन मीना आदींची उपस्थिती होती.
*न नौ मन तेल होगा, न राधा नाचेगी*
वरोरा रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी जवळपास ३५ वर्षांपासून रेल्वे प्रवासी मंडळ, रेल्वे प्रवासी संघ झटत आहे. विविध संघटने तर्फे वेळोवेळी विविध मागण्यांचे प्रस्ताव जनप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय रेल्वेमंत्री यांना पाठवून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली गेली. मागील तीन दशकांपेक्षा अधिकचा कालावधी लोटूनही गोरखपूर सुपरफास्ट एक्सप्रेससह अन्य गाड्यांच्या थांब्याची मागणी अद्यापपर्यंत पूर्ण झाली नाही. उलट ज्या गाड्या सुरू होत्या त्या सुद्धा बंद करण्यात आल्या. विशेष म्हणजे राज्यातील विविध रेल्वे स्थानकावर मागणी नसूनही थांबा व अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
मात्र, सन 1877 मध्ये टर्मिनल असलेले वरोरा रेल्वेस्थानक याला अपवाद ठरले आहे. हा दैवदुर्विलास आहे. पुढेही वरोरा स्थानकावर गाड्यांचे थांबे रेल्वे प्रशासन मंजूर करेल, असे चिन्ह त्यांच्या बोलण्यातून दिसत नाही. कारण जो पर्यंत नवीन रेल्वे लाईन्सचे काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत वरोरा तसेच जिल्ह्यातील जनतेला प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येते. याचाच दुसरा अर्थ असा निघू शकतो की, ” न नौ मन तेल होगा, न राधा नाचेगी “.
राजेंद्र मर्दाने
अध्यक्ष
वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघ.