कोणत्याही भाषेची बोलीभाषा हीच भाषा समृद्ध करीत असते : डॉ.विद्याधर बन्सोड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोणत्याही भाषेची बोलीभाषा हीच आपली मातृभाषा समृद्ध करीत असते म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या बोलीभाषेतूनच भावना,विचार प्रकट करावे यासाठी लाज बाळगण्याची काहीही गरज नाही. उलट बोलीभाषेतूनच आपले विचार किंवा बोलणे समोरच्याच्या हृदयापर्यंत सहज जाऊन पोहोचते असे विचार डॉ.विद्याधर बन्सोड यांनी शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर येथील मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ” मराठी भाषा गौरव दिन “या कार्यक्रमात “आपली मराठी अभिजात मराठी”
या विषयावर बोलत असताना आपले मत प्रतिपादन केले
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. हेमचंद दूधगवळी,डॉ. संजय गोरे, डॉ.सुनील बिडवाईक विचारपीठावर उपस्थित होते.
डॉ. बन्सोड पुढे बोलताना म्हणतात की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले परंतु कोणीही मराठी भाषेची व ग्रंथाची प्राचीनता शोधताना दिसत नव्हते यासंदर्भात ते पुढे म्हणतात हाल सातवाहनाची “गाथा सप्तशती” हा महाराष्ट्राचा आद्यग्रंथ होय. महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास, समाजव्यवस्था लोकरीती आपणापुढे ठेवणारा हा प्राचीन ग्रंथ आहे. महाराष्ट्री प्राकृत भाषेत महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेचे समकालीन जीवन चित्रण करण्याचा गाथा कवींनी पायंडा घातला.”गाथा सप्तशती “हा प्राकृतातला आद्यग्रंथ होय. गुणाढ्य यांनी पैशाची भाषेत बड्डकहा, ( बृहतकथा )लिहिली.
पैशाची भाषेतील” बृहतकथा ” ह्या ग्रंथाचा कर्ता गुणाढ्य हा पैठण येथील असावा. सातवाहन राजा हाल यांच्या दरबारात तो प्रधान होता. मराठी व महाराष्ट्राचा उद्गम शौरसेनी प्राकृत मधून झाला असे मानले जाते.मराठीही बावन बोली भाषेमध्ये बोलली जाते. बोलीभाषा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल बोलीभाषांमध्ये बोलताना कोणताही न्यूनगंड बाळगू नये मराठी ही आमची प्राचीन भाषा आहे.
याप्रसंगी प्रास्ताविक करताना डॉ. हेमचंद दुधगवळी यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्यावर व जीवनावर प्रकाश टाकला तर डॉ. संजयकुमार सिंह यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेश गायधनी,डॉ. माया मसराम, डॉ. सत्येंद्र सिंह, ग्रंथपाल मंगेश करंबे प्रा. प्रतिक वरकड व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. उज्वला जानवे यांनी केले तर आभार डॉ. शरद बेलोरकर यांनी मानले