जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अकोला कृषि विद्यापीठातील शिवार फेरीच्या माध्यमातून शाश्वत शेती तंत्रज्ञान जाणून घ्यावे
जिल्हाधिकारी वान्मथी सी यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे तब्बल 25 एकर प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी जिवंत पिक प्रात्यक्षिके साकारली आहेत, ती प्रात्यक्षिके जिल्ह्यातील शेतकर्यांनी बघावी, जेणेकरून जागतिक हवामान बदलाच्या परिस्थितीत “शाश्वत शेती व संपन्न शेतकरी” संकल्पना आत्मसात करता येईल. कालसुसंगत आधुनिक शेती तंत्रज्ञाना सोबतच शेती पूरक जोडधंदे, गावपातळीवर करता येणारे शेतमाल प्रक्रिया उद्योग आदी संबंधी माहिती मिळेल आणि कृषी विद्यापीठा सोबतच इतरही सलग्न संस्थाद्वारे निर्मित शेती विषयक तंत्रज्ञान तथा पीक वाणांचे शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष अवलोकन करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
रविवार दिनांक २० सप्टेंबर ते मंगळवार दिनांक २२ सप्टेंबर दरम्यान शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले असून या तीन दिवसीय शिवार फेरीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता सोमवार दि. २१ सप्टेंबर हा दिवस देण्यात आलेला आहे. नोंदणीनंतर २० हूनही अधिक विविध प्रक्षेत्र व संशोधन विभागाना प्रत्यक्ष भेटी देण्याची संधी शेतकरी बांधवांना उपलब्ध केल्या गेली आहे.
शिवार फेरीत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील जवळपास सर्व पिके व त्यांचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष बघता यावे या हेतूने गहू संशोधन विभागाचे प्रक्षेत्रावर शेतकरी बांधवाना पाहण्यासाठी एकाच ठिकाणी खरीप पिकांचे विविध जातीचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये विविध पिकांच्या जाती लावण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तेलबिया, कडधान्य, तृनधान्य,कापूस, चारापिके, भाजीपाला पिके व फुलांच्या जाती येथे लावण्यात आलेल्या आहेत. तसेच विद्यापीठाचे महत्वाचे शिफारशीचे पण प्रात्यक्षिक येथे घेण्यात आले आहेत.
या शिवार फेरीच्या निमित्ताने शेतकऱ्यांना आपल्या शेतीविषयक समस्यांचे निरसन तज्ञांकडून वेळीच करण्याची ही सुवर्णसंधीच उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनींनी या शिवार फेरीचा लाभ घ्यावा व येणारा हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. तसेच कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.जिवन कतोरे यांनी केले आहे



