सेलू येथील कोटी रुपये खर्च करूनही बस स्थानक बनले भ्रस्टाचाराची भेट!
कोट्यावधी रुपये खर्चूनही दिड वर्षातच झाली दयनीय अवस्था! उघड झाली भ्रष्टाचाराची पोल..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :- स्थानिक पातळीवर कोटी रुपये खर्च करून प्रवाशांच्या सोयीसाठी बांधलेल्या सेलूच्या सुसज्ज बस स्थानकाची प्रशासकीय उदासीनता आणि भ्रष्टाचारांमुळे दुरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी ज्या बस स्थानकाच्या बांधकामामुळे आसपासचे नागरिक आणि प्रवासी आनंदी होते, त्याच इमारतीची अवस्था दयनीय झाली आहे. निकृष्ट बांधकामामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात आणि पावसात विनाकारण त्रास सहन करावा लागत असून, आता हे बस स्थानक मद्यपी आणि समाजकंटकांचा अड्डा बनले आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
छत गळल्यामुळे निकृष्ट बांधकामाची पोलखोल झाली असून, प्रवाशांवर बस स्थानकातच हातात छत्री धरण्याची वेळ आली आहे. कोटी रुपयांच्या निधीतून उभारलेल्या या इमारतीच्या लोकांर्पणापासूनच यावर संकटाचे ढग दाटले होते. उन्हाळ्यात आलेल्या वादळ-वाऱ्यादरम्यान बस स्थानकावर लावलेली चमकदार नेमप्लेट उडून गेली, ज्यामुळे पोलखोल झाली. यानंतर पाऊस सुरू होताच या सुसज्ज इमारतीचे छत गळू लागले. बस स्थानकाच्या आतमध्येच प्रवाशांना छत्री उघडून बसावे किंवा भिजण्याची मजबुरी पत्करावी लागत आहे.
यामुळे पूर्वी आनंद व्यक्त करणारे नागरिक आता संबंधित कंत्राटदार, बांधकाम अभियंता आणि कमिशनखोरांना उघडपणे कोसत आहेत. या बस स्थानकावर प्रेमी युगुल आणि मद्यपींचे वर्चस्व निर्माण झाले असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसभर प्रेमी युगुलांच्या येण्या-जाण्याचे केंद्र बनणारे हे बस स्थानक रात्री मद्यपींचा अड्डा बनते, अशी चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. प्रशासनाकडून याकडे होत असलेल्या पूर्ण दुर्लक्षामुळे समाजकंटकांचे मनसुबे बळकट झाले आहेत.
दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा एकदा सरकारी तिजोरीची लूट करण्यासाठी सध्या या बस स्थानकाचे शेड पावसाळ्यात गळत असून अनेक ठिकाणी तुटले असून, दुरुस्तीच्या नावाखाली या इमारतीचे स्वरूप ‘उजाड चमन’ झाले आहे. यावर झालेला मूळ खर्च तर पाण्यात गेलाच आहे, परंतु आता पुन्हा दुरुस्तीच्या नावा खाली लाखो रुपयांचा खर्च कोणाच्या माथी मारला जाईल? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या प्रकरणात कोण हिंमत दाखवून सत्य समोर आणेल, की नेहमीप्रमाणे सगळे मिळून प्रकरण दाबून टाकतील? असा मोठा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.* तालुका प्रतिनिधी



