खरीप हंगामातील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीक स्पर्धेचे आयोजन
शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन ; तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पारितोषिके

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :- खरीप हंगाम २०२६ अंतर्गत अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
पीक उत्पादनात वाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रगतिशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्ट पूर्वी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करावा.
स्पर्धेसंदर्भातील पात्रता, अटी व शर्ती, नोंदणी प्रक्रिया आणि अंतिम मुदतीची माहिती संबंधित कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून उपलब्ध होईल. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन शासनाच्या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
बक्षिसांचे स्वरूप
तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर होणाऱ्या या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय अशी प्रत्येकी तीन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तालुकास्तरावर पाच हजार, तीन हजार व दोन हजार, जिल्हास्तरावर दहा हजार, सात हजार व पाच हजार आणि राज्यस्तरावर पन्नास हजार, चाळीस हजार व तीस हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.


