संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान रखडल्याने भाजपचा आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपणा : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मागील अनेक महिन्यांपासून मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा होत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयाच्या वारंवार चकरा मारूनही त्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नसल्याची तक्रार केली आहे.
लाभार्थ्यांनी आधार लिंक, हयात प्रमाणपत्र तसेच शासनाने आवश्यक केलेली सर्व कागदपत्रे वेळेत सादर करूनही विविध कारणे पुढे करून अनुदान वितरणात विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे अनेक निराधार, वृद्ध, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार पल्लवी आखरे यांना निवेदन देण्यात आले. 10 जुलैपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रखडलेले अनुदान जमा न झाल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संजय मुसळे, शहराध्यक्ष अमोल आसेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दिनेश खडसे तसेच सुनील देरकर उपस्थित होते.



