सेलू शहरात दूषित पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न; नागरिकांमध्ये संताप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेलू शहरातील काही भागांमध्ये नगरपंचायतीकडून होत असलेल्या पाणीपुरवठ्यात दूषित व गढूळ पाणी येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून नगरपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व छायाचित्रांच्या माध्यमातून नळातून येणाऱ्या पाण्याची स्थिती दाखवून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. संबंधित व्हिडिओमध्ये पाण्याचा रंग गढूळ व दूषित असल्याचे दिसून येत आहे. असे पाणी पिण्यासाठी किंवा घरगुती वापरासाठी अयोग्य असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, अतिसार, ताप तसेच इतर जलजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने पाणीपुरवठा यंत्रणेची तात्काळ तपासणी करून दूषित पाण्याचा स्रोत शोधावा व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा.
या संदर्भात नगरपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित विभागामार्फत पाण्याची तपासणी करावी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी सेलूकरांकडून जोर धरत आहे.



