मूठभर दाणे,ओंजळभर पाणी…आमच्यासाठी, ठेवाल का कोणी..!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सर्वच ठिकाणी तीव्र उष्णतेच्या झळा लागत आहेत. अशातच अवकाळी पावसाने काही जिल्ह्यात हजेरी लावल्याने तापमानात चढ उतार दिसून येत आहे. उन्हाळ्यात ठराविक वेळेनंतर थंड पाणी पिऊन आपण स्वतःला उन्हापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. असेच काहीसे प्राणी, पक्षांचेही आहे. त्यांनाही पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याअभावी अनेक प्राणी पक्षांचा मृत्यू होतो.
निसर्गाच्या साखळीमध्ये प्राणी पक्षांना देखील सर्वाधिक महत्त्व आहे. यासाठी एक जबाबदार नागरिक, सामाजिक भान, माणुसकी म्हणून आपण प्राणी, पक्षांसाठी त्यांची तहान भागवण्यासाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी, उन्हाळ्याच्या दिवसात तळमळीने प्रयत्न केले पाहिजे.
अनेक पर्यावरण प्रेमी, सामाजिक संस्था आज पुढे येऊन काम करत असून, आपण देखील घराच्या खिडकीत,अंगणात, इमारतीच्या गच्चीवर प्राणी, पक्षांसाठी पाणी ठेवणे गरजेचे आहे. उष्णतेमुळे होणारा परिणाम फक्त माणसावरच न होता पक्षी आणि प्राणी यांच्यावरही होत असल्याचे दिसते आहे.
*अशी करता येईल व्यवस्था*
घरी सावलीच्या ठिकाणी व पक्षांना मुक्त वातावरण मिळेल अशा ठिकाणी मातीच्या पसरट भांड्यात पाणी ठेवावे. पक्षांना आंघोळही करता येईल असे भांडे असावे.
पाण्यासोबतच अन्नाची व्यवस्थाही करता येईल. विशेषता ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ आदी धान्याचा भरडा उत्तम ठरेल. यासह भाताचे शीत व पोळ्यांचे बारीक तुकडे करून ठेवता येतील. पाणी आणि धान्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या, बरण्या, तार, दोरी, मातीचे भांडे आदींचा वापर करून फिडर तयार करता येईल. असे कृत्रिम फीडर आता बाजारातही उपलब्ध आहेत.
मातीचे पात्र बांधणे शक्य नसेल तर नारळाच्या करवंटी चा वापर केला जाऊ शकतो. झाडावर बांधणे शक्य नसेल तर झाडाखाली, झुडपात सावली राहील तिथे पाणी व धान्य ठेवता येईल.



