गोजोली मक्ता येथील सातवीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा स्त्युत उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
शाळा म्हणजेच विद्यामंदिर. या विद्या मंदिरात चिमुकले प्रवेश घेतात आणि आपल्या सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षकांच्या मदतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, शेवटचा वर्ग शिकून पुढील वर्गासाठी कोणत्यातरी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतात. मात्र दुसऱ्या शाळेत जाण्यापूर्वी शाळेत पहिल्यांदाच एक उपक्रम राबविला जातो, तो म्हणजे निरोप समारंभ. असाच काहीसा प्रसंग जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गोजोली मक्ता येथील विद्यार्थ्यांनी अनुभवला.
इयत्ता पहिलीपासून आपले नाव दाखल केले आणि सात वर्ष ज्या शाळेत बालपणापासून किशोर अवस्था घालवली, अशा शाळेतून निरोप घेताना सातवीच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटले होते. स्नेह आणि आपुलकीचे संबंध, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये तयार झालेले हे ऋणानुबंध आणि या सर्वांची मेळ म्हणजेच सर्वांगीण विकास. या दिवसाची आठवण घेत विद्यार्थ्यांनी शाळेतून निरोप घेतला.
आपल्या अनुभवातून शाळेत शिकलेल्या सर्व विषय, वेगवेगळे क्रीडा, कला, शिक्षकांनी कधी वेळप्रसंगी शिक्षा केली असेल, या उलट आई-वडिलांसारख नातं जपत शिक्षकांनी मार्गदर्शक म्हणून प्रेमाने जवळ सुद्धा घेतले, असे मत निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. याप्रसंगी शाळेच्या वतीने सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बिंदू पेंदोर, नीतू बोनगीरवार, सुनीता कन्नाके, भावना शेंडे, संतोष कडते, सुनील सोनुले, विनोद कुंमरे, शिक्षक भावेश विश्वास, मुख्याध्यापक मुरलीधर सरकार, शिक्षिका साधना उराडे तसेच इतर पालक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सहावीची विद्यार्थिनी अनुष्का टेकाम तर आभार प्रदर्शन तनुष्का कळते या विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांचे पुढील आयुष्य सुख, समाधान, उंच भरारी घेण्याचे सदिच्छा व्यक्त करत हा निरोप समारंभाचा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न करण्यात आला.


