ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुस नगर परिषदेची विशेष अर्थसंकल्पीय बैठक संपन्न

मात्र निर्णयांवर गूढ कायम!

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर (घुग्घुस) : घुग्घुस नगर परिषद कार्यालयात २० मार्च रोजी आयोजित विशेष अर्थसंकल्पीय स्थायी समितीची बैठक औपचारिकरित्या पार पडली असली, तरी या बैठकीत नेमके कोणते ठोस निर्णय घेण्यात आले याबाबत अद्यापही पडदा कायम आहे. यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शुक्रवारी दुपारी ४ वाजता स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत प्रशासनाने तयार केलेला आर्थिक वर्ष २०२५-२६ चा सुधारित अर्थसंकल्प तसेच २०२६-२७ चा मूळ अर्थसंकल्प महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमांतर्गत मंजुरीसाठी समितीसमोर सादर करण्यात आला. नियमानुसार या अर्थसंकल्पावर चर्चा देखील झाली, मात्र त्या चर्चेचा निष्कर्ष काय निघाला—याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

विशेष म्हणजे स्थायी समितीच्या सभापतींची निवड झाल्यानंतर ही पहिलीच विशेष अर्थसंकल्पीय बैठक होती, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. बैठकीस समितीचे सदस्य उपस्थित होते, मात्र जनहिताशी संबंधित महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात होत असलेला विलंब नागरिकांची चिंता वाढवणारा ठरत आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, अर्थसंकल्प हा जनतेच्या पैशांशी संबंधित असल्यामुळे त्यावरील निर्णय त्वरित जाहीर होणे आवश्यक आहे. प्रशासन नेमके कोणत्या कारणामुळे विलंब करत आहे? काही लपवले जात आहे का, की हा केवळ निष्काळजीपणा आहे असे प्रश्न उपस्थित होत आहेत।

आता सर्वांचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहे की, घुग्घुस नगर परिषद अखेर हे निर्णय कधी जाहीर करणार आणि नागरिकांना त्यांच्या हक्काची माहिती कधी मिळणार?

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये