ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मजुरांनाही मुंडे अपघात योजनेचा लाभ द्या

आमदार मनोज कायंदेच्या मागणीवर मुख्यमंत्री सकारात्मक 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 असंघटित मजुरांसाठी कायंदेचा विधानसभेत आवाज

 सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करण्याची व्यक्त केली गरज 

राज्यातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कष्टकरी मजुरांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा मिळावी, यासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेत मजूर वर्गाचा समावेश करण्याची ठोस मागणी सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी विधानसभेत केली. त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत शासन या विषयावर विचार करेल, असे आश्वासन दिल्याने मजूर वर्गात आशेची नवी किरण निर्माण झाली आहे.

राज्यातील हजारो मजूर बांधकाम, शेती तसेच विविध असंघटित क्षेत्रांमध्ये कष्टाची कामे करत आहेत. मात्र, या कामांमध्ये अपघाताचा धोका कायम असतो. अपघात घडल्यास संबंधित मजुरांच्या कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट ओढवते. या पार्श्वभूमीवर अशा कष्टकरी मजुरांना स्व. गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेच्या संरक्षणाखाली आणणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार मनोज कायंदे यांनी सभागृहात ठामपणे मांडले.

मजूर वर्गासाठी सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करण्याची ही काळाची गरज असल्याचे सांगत कायंदे यांनी सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. त्यांच्या या मुद्द्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरकार या विषयावर सकारात्मक विचार करून मजुरांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो मजुरांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मजूर वर्गाच्या हक्कांसाठी आपण सातत्याने आवाज उठवत राहणार असल्याचेही आमदार मनोज कायंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. शासनाने या मागणीवर ठोस निर्णय घेतल्यास राज्यातील कष्टकरी मजुरांना मोठे सामाजिक व आर्थिक संरक्षण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये