सालोड येथे आयोजित समाधान शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद
शिबिरास दीड हजारावर लाभार्थ्यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टप्पा क्रमांक एक अंतर्गत वर्धा तालुक्यातील सालोड (हिरापूर) येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास दीड हजारावर लाभार्थ्यांनी उपस्थित राहून महसूलसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविला.
यावेळी उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, सालोडचे उपसरपंच आशिष कुचेवार तसेच तहसीलदार व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थी यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण व्हावे, तक्रारी तत्काळ निकाली निघाव्यात तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा एक राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सालोड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबीरामध्ये जवळपास १ हजार ५७५ नागरिकांनी सहभाग नोंदविला. शिबिरामध्ये आरोग्य विभागामार्फत ५२० नागरीकांनी आरोग्य तपासणी करण्यात आली. महसूल विभागामार्फत २८७ फेरफार निकाली काढण्यात आले. एकुण ४३३ डिजिटल सातबारा वाटप करण्यात आले. तसेच एकुण ४३३ आठ अ सुद्धा वाटप करण्यात आले. शैक्षणिक व इतर असे एकुण ८४७ दाखले, प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे.
एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत २७५ अर्ज निकाली काढण्यात आले. भुसंपादन प्रकरणी कमी-जास्त पत्रकानुसार एकुण १३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच सातबारा दुरुस्ती संदर्भात स्विकारण्यात आलेल्या एकुण १७५ अर्जांवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली.
महाराष्ट्र जमिन महसूल संहिता १९६६ चे कलम ८५ अन्वये आपसी वाटणीची १३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. नागरीकांनी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिनांक १० एप्रिल रोजी ग्रामपंचायत सभागृह, आंजी (मोठी) येथे आयोजित समाधान शिबीरामध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी सहभाग घेऊन शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वर्धा तहसीलदार यांनी केले आहे.



