ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय सेवा योजना ही जबाबदारी निर्माण करणारी एक सशक्त चळवळ : श्रीमती नंदाताई कायंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नीत समृद्ध कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने दत्तक ग्राम सावखेड भोई येथे दि. २३ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान “सात दिवसीय समारोप शिबिर” उत्साहात पार पडले. हे शिबिर गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.

शाश्वत विकासाची संकल्पना प्रत्यक्षात राबविण्याच्या उद्देशाने युवा विकास, पाणलोट व्यवस्थापन, पडीत जमीन विकास, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, कृषी व पशुसंपदा समृद्धी तसेच आरोग्य शिबिर यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शिबिराचे समारोप नंदाताई कायंदे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय देवानंद कायंदे व भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर एनएसएस गीत, महाराष्ट्र गीत व ‘वंदे मातरम्’ या गीतांनी वातावरण देशभक्तीने भारावून गेले.

अध्यक्षीय भाषणात नंदाताई कायंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ एक योजना नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची आणि सामाजिक जाणीव जागविण्याची प्रभावी चळवळ आहे, असे प्रतिपादन केले. “विद्यार्थ्यांच्या हातून समाजसेवा आणि देशसेवा घडावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे कार्यक्रमाधिकारी प्रा.योगेश चगदळे, प्रा.शेळके, तसेच शेतकरी प्रतिनिधी जाधव उपस्थित होते. प्राचार्य डॉ. मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शाश्वत शेती, जोडधंदे, विद्युत पंप, फळबाग व भाजीपाला उत्पादन यांसारख्या उपक्रमांकडे वळावे, यावर भर दिला.

समारोप कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचा व कार्यक्रम अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. .कार्यक्रमास शेतकरी विष्णू गांधिले तसेच रमाबाई जाधव हे उपस्थित होते. महिला प्रतिनिधी गंगाबाई जाधव यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तसेच समर्थ ब्लड बँकेच्या वतीने १८ रक्तदात्यांना रक्तदान प्रमाणपत्रांचे वितरण डॉ. प्रकाश भांगे यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरात एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी चार विद्यार्थिनींनी सात दिवसांच्या अनुभवांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “या शिबिरामुळे आमच्यात नवी ऊर्जा निर्माण झाली; भाषणकला, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसित झाला.”

प्रा. अश्विनी जाधव, प्रा. विकास म्हस्के, प्रा. अरुण शेळके, प्रा. वैभव देशमुख, प्रा. सचिन सोळंकी, प्रा. अनिता सानप, डॉ. उषा जायभाये, सय्यद असिम आदींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ एक उपक्रम नसून युवकांच्या मनात समाजाबद्दल संवेदनशीलता, जबाबदारी आणि बांधिलकी निर्माण करणारी सशक्त चळवळ आहे. “Not Me, But You” या ब्रीदवाक्याची प्रत्यक्ष अनुभूती देणारे हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी आत्मविकास, नेतृत्वनिर्मिती आणि समाजसेवेची प्रेरणादायी सुवर्णसंधी ठरले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती मोरे हिने केले.

तर आभार प्रदर्शन अंकिता काळे हिने केले. शकुंतलाबाई साबळे, लताबाई जाधव, द्वारकाबाई टेकाळे आणि पुष्पा वाघमारे यांनी सात दिवस स्वरूची भोजनाचा आनंद दिला. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये