ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील अव्वल ‘१०० टक्के सौर ग्राम’ म्हणून उथळपेठची ऐतिहासिक नोंद

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सौर ऊर्जा संकल्पनेची आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून उथळपेठमध्ये प्रभावी अंमलबजावणी

चांदा ब्लास्ट

उथळपेठ येथे १८० पैकी १८० घरांवर सौर पॅनल

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते १७ डिसेंबरला लोकार्पण सोहळा

चंद्रपूर :_ देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ऊर्जा स्वावलंबन, पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांना वीज बिलातून दिलासा मिळावा यासाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ सुरू करून प्रत्येक भारतीयाला सौर ऊर्जेकडे वळण्याचे आवाहन केले. या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून प्रेरणा घेत राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मुल तालुक्यातील उथळपेठ गावाने महाराष्ट्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.उथळपेठ गावातील विद्युत ग्राहकांनी १८० पैकी १८० घरांवर सौर पॅनल बसवून महाराष्ट्रात सर्वाधिक ‘१०० टक्के सौर ग्राम’ म्हणून उथळपेठची ओळख निर्माण केली आहे. या उपक्रमाचे लोकार्पण दि. १७ डिसेंबर रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आ. मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात राज्यातील ठळक व अव्वल कामगिरीची नोंद उथळपेठने केली आहे.

आ.सुधीर मुनगंटीवार यांनी सदर प्रकल्पासाठी जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत शाश्वत विकास ध्येय योजनेतून सुमारे ८३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. या निधीच्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ, शाश्वत व पर्यावरणपूरक ऊर्जेचा लाभ मिळाला असून, वीजबिलात बचत, अखंड वीजपुरवठा तसेच कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होण्यास मदत झाली आहे.

उथळपेठ गावाचा हा सौर ऊर्जेचा उपक्रम ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरत असून, ‘ऊर्जा स्वावलंबन’ आणि ‘शाश्वत विकास’ या राष्ट्रीय उद्दिष्टांना बळ देणारा आहे. ग्रामीण भागातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास शक्य आहे, हे उथळपेठने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले आहे.

या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता उथळपेठ (ता. मुल, जि. चंद्रपूर) येथे आयोजित करण्यात आला आहे. या लोकार्पण कार्यक्रमास बल्लारपूर मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे प्रत्यक्ष उपस्थित राहून उथळपेठ सौर ग्राम लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

उथळपेठ गावातील प्रत्येक घरावर सौर ऊर्जा पॅनल बसविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत शाश्वत विकास ध्येय योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या पुढाकारामुळेच उथळपेठ गाव आज महाराष्ट्रातील अव्वल ‘१०० टक्के सौर ग्राम’ म्हणून ओळखले जात असून, भविष्यात राज्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरणार आहे.

ही यशोगाथा स्वच्छ ऊर्जा, पर्यावरण संरक्षण आणि ग्रामीण विकास यांचा समन्वय साधणारी असून, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ‘हरित भारत’ संकल्पनेला पूरक ठरणारी आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकाराबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये