मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
सार्वजनिक ठिकाणी कुंपण, निर्जंतुकीकरण व आश्रयस्थाने उभारण्याच्या सूचना

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल रिट पिटीशनच्या ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी पारित आदेशानुसार, मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली विस कलमी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. सदर बैठकीस संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
भारतीय जीवजंतु कल्याण बोर्डाने निर्धारित केलेल्या SOP (Standard Operating Procedure) नुसार कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शैक्षणिक संस्था, सार्वजनिक व खाजगी रुग्णालये, क्रीडा संकुल, बस स्थानके व डेपो (आंतरराज्य बस टर्मिनलसह), रेल्वे स्थानके, धार्मिक स्थळे, बाल उद्याने, पर्यटन व मनोरंजन स्थळे आदी ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा प्रवेश रोखण्यासाठी कुंपण, सीमा भिंत व प्रवेशद्वार उभारण्याच्या सूचना दिल्या. ही संरक्षक तटबंदी किमान ६ फूट उंचीची असावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच संबंधित व्यवस्थापनांनी भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी व स्वच्छतेसाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. परिसरातील कुत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने पकडून त्यांचे निर्जंतुकीकरण, लसीकरण व निर्बीजीकरण करून मनपा अथवा नगरपालिकांनी चालविलेल्या आश्रयस्थानी किंवा प्राणी कल्याण संस्था, गोशाळा, पांजरपोळ व स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मनपा आयुक्त व नगरपालिकांना दिलेल्या प्रमुख सूचना :
• सार्वजनिक ठिकाणांवरून पकडलेल्या कुत्र्यांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत निर्जंतुकीकरण व लसीकरण करणे.
• आश्रयस्थानी ठेवण्यापूर्वी कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले आहे, याची खातरजमा करणे व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटर व साहित्य उपलब्ध करून देणे.
• विशेषतः ६ महिन्यांवरील नर कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण करणे व ५ वर्षांपर्यंत दरवर्षी रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे.
• भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुत्र्यांसाठी सुसज्ज आश्रयस्थाने उभारणे व त्याठिकाणी पाणी, खाद्य, स्वच्छता व देखरेखीची योग्य व्यवस्था ठेवणे.
• आक्रमक अथवा रेबीज बाधित कुत्र्यांना ज्या परिसरातून पकडले आहे त्या परिसरात पुन्हा सोडू नये.
मानव व प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोरपणे कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यावेळी केले.



