स्वच्छ सर्वेक्षण 2025 चे गावस्तरावर नियोजन करा – पुलकित सिह
चंद्रपुर जिल्ह्यातील गावांची होणार पाहणी

चांदा ब्लास्ट
स्वच्छ भारत मिशन आराखड्यातील 1400 गावांमध्ये मध्ये “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५” या उपक्रमांतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात निर्माण झालेल्या सुविधांचा वापर तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेले परिसर स्वच्छता शिवाय प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन बदललेल्या मानसिकतेची माहिती घेण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने पाहणी करण्यात येणार असल्याने, सर्व ग्रामस्थांनी मिळून लोकसहभाग व श्रमदानातून या सार्वजनिक सुविधांचा पुरेपूर वापर करत परिसराची स्वच्छता, व प्लास्टिक मुक्तीची अंमलबजावणी करावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी केले आहे.
जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या उपक्रमामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत सहभागी होत असते. केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीची अद्यावत माहिती घेऊन उभारण्यात आलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांची तपासणी करण्यासाठी हे पथक जिल्ह्यात येणार आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीची तपासणी करून एक हजार गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणांकनाच्या आधारे जिल्ह्याचे गुणांकन ठरणार आहे .त्याचप्रमाणे राज्याचे देखील गुणांकन देशपातळीवरती ठरणार असल्याने , प्रत्येक गावाने आपापल्या गावातील सर्व स्वच्छतेच्या सुविधांचा वापर नियमित केला पाहिजे. या पाहणी दरम्यान प्लास्टिक संकलन व व्यवस्थापन म्हणजेच वर्गीकरण केंद्राची पाहणी, खतखड्यांचे व्यवस्थापन, परिसर स्वच्छता तसेच गृहभेटीतून मिळणारी माहिती इत्यादी बाबत गुणांकन होणार आहे.
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांबाबत थेट निरीक्षणासाठी 120 गुण, ग्रामस्थांचा प्रतिसादासाठी 100 गुण, गावातील सुविधांचा वापराबाबत 240 गुण,तर प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षणा दरम्यान 540 गुणांची प्रश्नावली असणार आहे एकूण 1000 गुणांपैकी प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे देशातील व महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ सुंदर गाव व ग्रामपंचायत या मोहिमेदरम्यान घोषित होणार आहे.
ही तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत असल्याने गावातील सुविधांचा वापर तसेच बदललेल्या मानसिकतेबाबत कुटुंबांच्या भेटी शिवाय हा उपक्रम कायमस्वरूपी ठेवण्यासाठी गाव पातळीवर झालेली उपायोजना ग्रामस्थांचा सहभाग इत्यादी बाबी प्रामुख्याने पाहणी होणार आहे. गाव भेटी दरम्यान प्रत्यक्ष निरीक्षण करताना स्वच्छता सुविधांचे निरीक्षण, ग्रामस्थांचा सहभाग जनजागृती दृश्यमान स्वच्छता इत्यादी बाबत पाहणी होणार आहे.
कुटुंबाची गृहभेट होत असताना घरातील स्वच्छतेच्या सुविधांची स्थिती वैयक्तिक शौचालयाचा वापर, हात धुण्याच्या सवयी तसेच कुजणारा व नकुजणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण व त्याकरिता असलेली सुविधा याशिवाय सांडपाणी व्यवस्थापनाचे केलेले काम इत्यादी बाबत गुणांकन होणार आहे. गाव भेटी दरम्यान रस्त्यावर कुठेही सांडपाणी व घनकचरा पडलेला नाही. याशिवाय प्लास्टिक व्यवस्थापन हे कचरा वर्गीकरण केंद्रात केलेले आहे. निर्माण झालेल्या खतखड्यांमधून खत निर्मिती बाबत नियोजन केले आहे. याशिवाय सांडपाणी व्यवस्थापनाचे काम अतिशय सुरेख झालेले आहे. सार्वजनिक ठिकाणे ही स्वच्छ व नीटनेटकी केलेली आहेत . इत्यादी बाबत ही पाहणी होणार आहे.
सार्वजनिक ठिकाणे उदाहरणार्थ धार्मिक स्थळे, शाळा, अंगणवाडी, परिसर, बाजार तळ या ठिकाणी उघड्यावरती कचरा पडलेला नाही .तसेच सार्वजनिक शौचालयाची सुविधा नीटनेटकी आहे वापर सुरू आहे. कचरा वर्गीकरणासाठी वर्गीकरण केंद्र आहे आणि हा परिसर स्वच्छ असून मैलागाळ व्यवस्थापनाबाबत सुविधा गावात आहे .अशा प्रकारची पाहणी व गुणांकन होणार आहे.
प्लास्टिक संकलन व प्रक्रिया केंद्र तसेच गोवर्धन व मैलागाळ व्यवस्थापन इत्यादीचे पाहणी दरम्यान गुणांकन होणार आहे .
सर्वात महत्त्वाचे म्हणजे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची सुविधा ही आगामी भविष्यकाळात बचत गटांना किंवा इतर व्यवस्थेमार्फत कायमस्वरूपी चालविण्याबाबत सुरू ठेवण्याबाबत ग्रामपंचायतीने शाश्वत उपायोजना केलेली असल्यास त्याचेही गुणांकन यात होणार असल्याने सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच ग्रामपंचायत अधिकारी तसेच ग्राम पाणी पुरवठा समितीच्या सदस्यांनी दक्ष असावे. सर्व गावांनी स्वच्छ सर्वेक्षण 2025 चे गावस्तरावर नियोजन करावे. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी केले आहे.