खेळातून विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास _ गोविंद भाऊराव पेदेवाड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
व्यक्तिमत्व विकास म्हणजे माणसाचा सर्वांगीण विकास होय. या सर्वांगीण विकासात माणसाची शारीरिक व मानसिक सुदृढता आवश्यक असते. खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास हा सहजपणे होऊ शकते. शारीरिक व मानसिक दृष्ट्या विद्यार्थी खेळातून कणखर बनतो. खेळ ही एक शारीरिक कला आहे.दररोज किमान अर्धा ते एक तास खेळ खेळला पाहिजे.शालेय मुलांसाठी अभ्यासाबरोबरच खेळ सुध्दा महत्वाचा आहे .म्हणून खेळाचा समावेश शालेय जीवनात केला जातो.खेळामुळे चपळता वाढते व सोबतच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो.
व्यक्तिमत्त्व विकास हा विद्यार्थी जीवनाचा महत्वाचा पैलू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.खेळणे,बागडणे हे मुलांचे आवडीचे क्षेत्र आहे.मुलांना खेळ खेळायला खूप आवडतात.त्यामुळे त्यांना हे जग सुंदर भासते,त्यातच त्यांच्या शरीराची सुध्दा वाढ होत असते.ही वाढ होत असताना त्यांच्या शरीरात प्रचंड ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते.त्या ऊर्जेचा निचरा होण्यासाठीच मुलांना खेळायला मिळाले पाहिजे.यातच योग्य मार्गदर्शन मिळाले तर करियर देखील घडू शकते.
आज देशाला जर आत्मनिर्भर आणि सक्षम नागरिक हवा असेल तर मुलांना लहानपणापासूनच शारीरिक सुदृढतेचे धडे देणे आवश्यक आहे.म्हणून मुलांनी नियमित खेळ खेळला पाहिजे. जेव्हा मुलांच्या शारीरिक क्षमतेमध्ये वाढ होईल तेव्हा मुलांच्या बौद्धिकतेत ही वाढ होईल.
यासाठी पालकांचे पण सहकार्य महत्त्वाचे आहे.शाळेत अनेक क्रीडास्पर्धा होत असतात.त्यामध्ये पालकांचा सक्रिय सहभाग व सकारात्मक प्रतिसादाची गरज असते.काही पालकांना खेळणे,बागडणे म्हणजे व्यर्थ वेळ वाया घालवणे वाटते .परंतु,इतर गोष्टीप्रमाने मुलांच्या शारीरिक हालचालींना पण महत्व देणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांची शारीरिक सुदृढता जर चांगली असेल तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली असते.तसेच नियमित शारीरिक हालचालीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढून त्यांच्या मानसिकतेत बदल होतो.
शालेय जीवनात सर्वच मुलांना खेळायला मिळाले पाहिजे.कारण त्यामुळे चांगला व्यायाम घडतो.सर्व स्नायू लवचिक होतात.हृदयाचे स्नायू देखील बळकट झाल्यामुळे हृदयविकाराच्या समस्या निर्माण होत नाहीत.
खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते.खेळामुळे जीवनात आनंद निर्माण होतो.त्याशिवाय खेळ खेळण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगी खिलाडूवृत्ती,नेतृत्वगुण,संघभावना,सहकार्य,इत्यादी गुण रुजतात.विद्यार्थ्यांत निकोप स्पर्धा निर्माण होते.त्यामुळे अशा क्रीडा स्पर्धांचे व खेळांचे शाळेत दरवर्षी आयोजन केल्या जाते. त्यासाठी शिक्षक तथा पालकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला खेळ खेळण्यासाठी प्रेरित केले पाहिजे .खेळ हा प्रत्येक मुलांचा हक्क आहे.
याची जाणीव सर्वांनी ठेऊन विद्यार्थ्यांचा खेळातून व्यक्तिमत्त्व विकास करणे आवश्यक आहे.