गाव एका तालुक्यात अन् ग्रामपंचायत दुसऱ्या तालुक्यात
गणेरी गाववासीयांना करावी लागते दाखल्यासाठी पायपीट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- विविध समस्यांनी ग्रासलेला जिवती तालुका नेहमीच चर्चेत असतो, तालुका निर्मितीला २० वर्षांचा कालावधी लोटला असला तरी येथील जनतेच्या समस्या मात्र संपलेल्या नाहीत.
राजुरा तालुक्याचे विभाजन करून शासनाने सन २००२ मध्ये जिवती तालुक्याची निर्मिती केली, राजुरा व कोरपणा तालुक्यातील ८३ गावे जिवती तालुक्यात समाविष्ट करण्यात आली.
महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सिमावादात अडकलेल्या वादग्रस्त १४ गावांचा प्रश्न ऐरणीवर असतांनाच एक नवीन बाब समोर आली आहे, जिवती तालुक्यातील शेवटच्या टोकावर डोंगराळ भागात वसलेलं गणेरी हे
गाव विचित्र समस्याने ग्रासले आहे. या गावाला शैक्षणिक सुविधा जिवती तालुक्यातील असुन पंचायत समिती जिवती अंतर्गत एक ते पाच वर्ग असलेली जिल्हा परिषदेची शाळा आहे. गणेरी गाव राजुरा तालुक्यातील कावळगोंदी ग्राम पंचायतीत येत असुन शासकिय योजनांपासून कोसोदूर आहे.
३० घरांची वस्ती असलेल्या गावात दीडशेच्या आसपास लोकसंख्या असुन आदिवासींची संख्या जास्त आहे.
गावात शौचालय व पिण्याच्या पाण्याची मुख्य समस्या आहे.
एक हातपंप असुन तो ही बंद पडला आहे, ग्रामिण पाणी पुरवठा विभाग व ग्राम पंचायतच्या वतिने सौर उर्जेवर चालणाऱ्या दोन पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या मात्र त्याही पाण्याविणा कोरड्याच असल्याने गावकऱ्यांना गावापासुन लांब असलेल्या हातपंपावरुन पाणी आणून तहान भागवावी लागत
आहे. गावातील नाल्यालगत असलेल्या विहिरीवरुन गावांपर्यंत पाईपलाईनचे काम झाले आहे मात्र टाकी उभारण्यात आली नाही. याबाबबत विचारणा करण्यासाठी ग्रामसेवकासी संपर्क केला असता त्याने प्रतिसाद दिला नाही.
विजेचा लपंडाव व आरोग्याची समस्या गावकऱ्यांच्या पाचविलाच पुजलेली आहे. ग्राम पंचायतची निवडणूक कुठे व कशी होते हे गावकऱ्यांनी माहित नसल्याचे सांगितले.
ग्रामसेवक केवळ घरपावती वसुली साठीच गावात येत असल्याची माहिती गावकऱ्यांनी
दिली. गणेरी गावापासुन पाच किलोमिटर अंतरावर असलेली पुनागुडा ग्राम पंचायत जिवती पंचायत समिती अंतर्गत आहे, व गणेरी गावापासुन पुढे तिन किलोमीटर अंतरावरील भाईपठार हे गाव पुनागुडा ग्राम पंचायतीत येते मात्र गणेरी हे एकच गाव राजुरा तालुक्यातील कावळगोंदी ग्राम पंचायतीत समाविष्ट असल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गणेरी हे गाव कावळगोंदी ग्राम पंचायतीतून विभक्त करून जिवती तालुक्यातील पुनागुडा ग्राम पंचायतीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.