चांदा पब्लिक स्कूल येथे पर्यावरण संरक्षण जागरूकता कार्यशाळेचे आयोजन
प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनाची सुरूवात स्वतः पासून करणे गरजेचे - डॉ. शरद काळे

चांदा ब्लास्ट
चांदा पब्लिक स्कूल येथे दि. 30/11/2023 रोजी पर्यावरण जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. शरद काळे हे होते. डॉ. शरद काळे हे बायोडिग्रेडेबल कचरा संसाधनावर आधारित बायोगॅस संयंत्र विकसित करण्यासाठी ओळखले जाणारे शास्त्रज्ञ आहेत. ते भाभा अनुसंशोधन केंद्रात तंत्रज्ञान हस्तांतरण आणि सहयोग विभागाचे प्रमुख आहेत. 26 जानेवारी 2013 रोजी भारत सरकारने त्यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयातील पदमश्री पुरस्काराने सन्मानित केले.
वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पर्यायी पर्यावरणाचे रक्षण करणे काळाची गरज आहे. पर्यावरणाचे संरक्षण केवळ सरकारची जबाबदारी नसून भविष्यातील धोके टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनाची सुरूवात स्वतः पासून करणे गरजेचे आहे. या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. शरद काळे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करित म्हणाले की, मानवाच्या अति हव्यासापोटी निसर्गाचा -हास होत आहे. पर्यावरणातील मानवाच्या अनियंत्रित हस्तक्षेपामुळे विविध पर्यावरणीय समस्या आज उभ्या ठाकल्या आहेत. निसर्ग आपल्यापासून दूरावत चालला आहे. अशावेळी निसर्गाचे जतन करणे ही काळाची गरज आहे. याची जाणीव आजच्या पिढीने ठेवणे गरजेचे आहे. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित सर्वांना केले.
या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी नैसर्गिक पर्यावरण हा सजीवांसाठी अनमोल ठेवा असल्याने तो आपण पुढील पिढ्यांसाठी व्यवस्थित जतन करून ठेवणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे आपले आद्य कर्तव्य आहे, नैतिक जबाबदारी आहे. तेव्हा पर्यावरणाशी आपुलकीचे नाते जोडा असा महत्त्वाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे संचालन ध्रूव मुंगोले तर आभार प्रदर्शन सृष्टी जाधव ह्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम प्रमुख माधवी सिद्धांतम, महेश गौरकार तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सहभाग होता.