कोरपना – वणी महामार्गाचे चौपदरीकरण केव्हा होणार
रस्ता नियोजन ही चुकीचे ; वाहतूक वाढल्याने रस्ता पडतो अपुरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
हिवाळी अधिवेशन स्पेशल
चंद्रपूर – यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या कोरपना ते वणी महामार्गाचे रस्ता सुलभता व वाढत्या वाहतुकीच्या दृष्टीने चौपदरीकरण होणे गरजेचे आहे. परंतु या महामार्गाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.यातच दोन्ही जिल्ह्याचे हद्दीतील रस्त्याची ठिकठिकाणी दुरावस्था झाली. त्यामुळे वाहतूकदार व परिसरातील ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. कोरपना ते वणी हे अवघे ४२ किलोमीटरचे अंतर आहे. मात्र मागील दोन दशकापासून या रस्त्याला दुर्दशा आणि दुर्लक्षितपणाचे चांगलेच ग्रहण लागले आहे. याचा फटका शेतकरी, परिसरातील ग्रामस्थ, कर्मचारी, विद्यार्थी , राज्य परिवहन महामंडळ सह औद्योगिक व आम रहदारीला सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यात यावे अशीही मागणी अनेकदा निवेदनामाध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांना करण्यात आली. परंतु आजवर कुठलीच पावले या संबंधाने उचलण्यात आली नाही. कोरपना ते वणी महामार्ग हा औद्योगिक कॉरिडोर मध्ये येतो. या महामार्गावरून चोवीस तास सिमेंट, कोळसा, गिट्टी खदान, लाईमस्टोन, डोलोमाईट, जिनिंग प्रेसिंग उद्योग आदींची अवजड वाहतूक होते.परंतु रस्त्याची क्षमता वीस टनचीच आहे. प्रत्यक्षात पनास टन हून अधिकची वाहतूक चालते.यामुळे हा रस्ता अल्पावधीतच दुरावस्थेकडे वाटचाल करतो आहे. या दृष्टीने महामार्गाचे आयुष्यमान वाढण्या व दर्जा टिकून राहण्यासाठी चौपदरीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे.
बांधकाम विभागाच्या रस्ते नियोजनात गोंधळ
कोरपना ते वणी हा चंद्रपूर – यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा,एका सरळ रेषेतील प्रमुख मार्ग आहे. पूर्वी वणी पासून बोरी जिल्हा सीमा ( कोरपना ) पर्यंतचा राज्य महामार्ग क्रमांक २३६ म्हणून एकाच राज्य महामार्ग क्रमांकात समाविष्ट होता. मध्यंतरी बांधकाम विभागाने नियोजन बदलून वणी ते चारगाव चौकी रस्त्याची लांबी करंजी – घुघुस प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक सहा ला जोडली. त्यानंतर चारगाव चौकी ते आबई फाटा दरम्यानची रस्ता लांबी सावंगी -सानेफळ – खैरी वडकी – नांदेपेरा-गडचांदूर राज्य महामार्ग क्रमांक ३१७ ला सलग्न करण्यात आली. तर आबई फाटा ते कोरपना राज्य महामार्ग क्रमांक ३७४ अस्तित्वात आणण्यात आला. त्यामुळे हा थेट मार्ग तीन राज्य महामार्गात विभागला गेला आहे. परिणामी या अत्यंत महत्त्वाच्या मार्गाचे संपूर्ण रस्ता नियोजनच बिघडले गेले. एकाच वेळी संपूर्ण रस्त्याचे नियोजन होत नाही. त्यामुळे एकीकडे रस्त्याची दुरुस्ती झाली की दुसरीकडे दुरावस्था होते अशी परिस्थिती आहे. या दृष्टीने बांधकाम विभागाने पूर्वीप्रमाणे कोरपना ते वणी थेट एकच महामार्ग क्रमांक देऊन नियोजन कायम ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना मोठा फटका
कोरपना ते वणी महामार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील शेतशिवारात मोठ्या प्रमाणात रस्त्याची धूळ उडते. परिणामी याचा फटका शेतमालाचे उत्पादनावर होते आहे. त्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत सुद्धा देण्यात येत नाही. यामुळे शेतकरी शेतमजूर यांच्याकडून रोष व्यक्त होत आहे.