वादळी पावसामुळे कोंढाळीतील जलशुद्धिकरण संयंत्राचे नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील कोंढाळी येथील जलशुद्धिकरण संयंत्र (पिण्याच्या पाण्याचे आरो यंत्र) नेस्तनाबूत झाले. या दुर्घटनेत सुमारे तीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले आणि काही क्षणांतच जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या वाऱ्याचा जोर इतका जबरदस्त होता की कोंढाळी गावातील सार्वजनिक वापरासाठी लावलेले जलशुद्धिकरण संयंत्राचे नुकसान झाले. संयंत्राचे छप्पर, यंत्रणा आणि पाइपलाइन पूर्णतः उध्वस्त झाली आहे.
या घटनेनंतर घोडपेठ येथील तलाठी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. प्राथमिक पाहणीत अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोतच नष्ट झाल्याने गावातील नागरिक सध्या पाण्याच्या संकटाला सामोरे जात आहेत.