वृक्षास राखी बांधून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश
रोव्हर्स, रेंजर्स, एनसीसी छात्र सैनिक, रासेयो स्वयंसेवक व राष्ट्रीय हरित सेनेचा उपक्रम
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
देवळी : ‘पर्यावरणाच्या संतुलनाकरिता वृक्षांचे संवर्धन करणे आवश्यक आहे या दृष्टिकोनातून महाविद्यालयाच्या परिसरात संवर्धित केलेल्या वृक्षांना राख्या बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुनिता सोनारे यांनी रक्षाबंधनाच्या पर्वावर आयोजित कार्यक्रमात 19 ऑगस्ट रोजी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर सुनिता सोनारे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक प्रभाकर ढाले प्राध्यापक जगदीश यावले व एनसीसी अधिकारी तथा रोव्हर लीडर कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.
स्नेह, बंधूभाव व आदर्श नागरिकांचे गुण विकसित व्हावे या हेतूने रक्षाबंधन सोहळा युवक युवतींकरिता गेल्या 30 वर्षापासून आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत रेंजर्स व स्वयंसेविकांनी एनसीसी छात्र सैनिकांना तसेच रासेयो स्वयंसेवकांना राख्या बांधल्या. तसेच महाविद्यालयाच्या परिसरात संवर्धित केलेल्या वृक्षांना रंगीबेरंगी राख्या बांधून वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प केला.
यावेळी आपल्या मार्गदर्शनात डॉ. ढाले म्हणाले रक्षाबंधन हा सण समाजात नैतिक मूल्य रुजविणारा सण आहे तर कॅप्टन मोहन गुजरकर म्हणाले धर्म जात, पंथ, प्रांत व देशांच्या सीमांना पार करून रक्षाबंधन एकात्मतेचे प्रतीक आहे.
याप्रसंगी रेंजर सुप्रिया यादव, कोमल शितळे, मनीषा मडकाम, मयुरी पेटकर, खुशी पचारे, रितेश बुटे, श्रुती घोडे, कुंदन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी उत्कृष्ट राख्या तयार केल्याबद्दल व्हिकी पेंदाम, नेहा घोडे व खुशी पचारे यांना प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिके देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो स्वयंसेवक कोमल शितळे हिने करून रक्षाबंधनाचे महत्त्व विशद केले. संचालन रेंजर श्रद्धा मडावी हिने तर आभार रेंजर सुप्रिया यादव हिने मानले. यशस्वीतेकरिता सार्जंट आदर्श नाईक, मनोज नेहारे, अभिषेक नेहारे, वैष्णवी शिरभाते तसेच एनसीसी छात्र सैनिक, रासेयो स्वयंसेवक, राष्ट्रीय हरित सेना व रोव्हर्स रेंजर्सनी प्रयत्न केले.