राममंदिर देणगीतील गैरव्यवहार विरोधात काँग्रेसचा सत्याग्रह
ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांविरोधात चंद्रपूर पोलिसांत तक्रार, सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी (दि. १३ जुलै) अंचलेश्वर मंदिर शिव देवस्थान (अंचलेश्वर गेट) येथे “रघुपती राघव राजा राम” सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि लोकशाही मूल्यांचा संदेश देणारे हे आंदोलन मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडले.
या सत्याग्रहाला खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, आमदार ॲड. अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी, माजी अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रय, माजी शहर अध्यक्ष संतोष लहामगे, संतोषसिंह रावत, दिनेश चोखारे, राजु रेड्डी, महिला जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर, नगराध्यक्ष अरुण धोटे, भाष्कर माकोडे, विजय घरत, अंबिकाप्रसाद दवे, प्रमोद बोरीकर, सुनील खंडेलवाल, मनीष तिवारी, गोपाल अमृतकर, सुनीता अग्रवाल, दिशा रामटेके, प्रेरणा गौर यांच्यासह जिल्हा व शहर काँग्रेस तथा काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशभक्त, रामभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्याग्रहादरम्यान प्रभू श्रीरामाचे रघुपती राघव राजा राम, खरा तो एकची धर्म, यासह विविध भजने , पूजन, अर्चन आणि प्रार्थना करण्यात आली. “रघुपती राघव राजा राम” या भजनाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांच्या नावाने आलेल्या देणगीबाबत पारदर्शकता राखली जावी, श्रद्धेचा मान राखला जावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी चंद्रपूर येथील पुरातन अंचलेश्वर मंदिर शिव देवस्थान येथे प्रार्थना करून भगवान श्रीराम मंदिरातील देणगी लुटणाऱ्यांना सद्बुद्धी दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.
यावेळी काँग्रेसच्या वतीने अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कोट्यवधी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा तीव्र निषेध करण्यात आला. रामभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या रोख रक्कम, सोने आणि चांदीच्या देणगीचा कथित गैरवापर झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणावर केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांनी मौन बाळगल्याबद्दलही काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली. रघुपती राघव राजा राम सत्याग्रहाची सांगता पसायदानाने करण्यात आली.
सत्याग्रहानंतर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात जाऊन श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र (न्यास) चे महासचिव चंपत राय, ट्रस्टी अनिल मिश्रा आणि कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या कथित प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली.
महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, सामाजिक सलोखा, संविधान आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास व्यक्त करत आयोजित करण्यात आलेला हा सत्याग्रह शांततापूर्ण, शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या आंदोलनातून प्रभू श्रीराम हे संपूर्ण देशाच्या श्रद्धेचे केंद्र असल्याने त्यांच्या नावाने जमा झालेल्या देणगीबाबत संपूर्ण पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याची गरज काँग्रेसने ठामपणे मांडली. मोठ्या संख्येने झालेल्या सहभागामुळे हे आंदोलन यशस्वीरित्या संपन्न झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



