ताज्या घडामोडी

भीषण अपघातात बस वाहकाचा जागीच मृत्यु – धुळवडीच्या दिवशी घडला थरार

चढ्ढा ट्रान्सपोर्टचा ट्रक व एस टी बसची जोरदार धडक - चंद्रपुर परिवहन विभागाच्या निष्काळजीपणामुळे अपघात?

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर नागपूर महामार्गांवर असलेल्या हायटेक फॉर्मसी महाविद्यालयाजवळ नेमक्या धुळवडीच्या दिवशी एस टी बस व अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चढ्ढा ट्रान्सपोर्टचा ट्रक ह्यांत भीषण धडक झाल्याने बस वाहक जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार अपघातस्थळी 12 मार्च रोजी चढ्ढा ट्रान्सपोर्ट कंपनीचा एक बलगर टँकर चुकीच्या दिशेने वळण घेत असताना रस्त्याच्या मधोमध उलटला. ह्यामुळे टँकर मधे असलेली राख मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडली. वास्तविक बघता ह्या महामार्गावरील वाहनांची प्रचंड वर्दळ 24 तास सुरू असल्याने परिवहन विभाग व महामार्ग पोलिसांनी सदर कंपनीकडून ही राख पूर्णपणे स्वच्छ करून तसेच पाण्याने रस्ता स्वच्छ करणे अत्यावश्यक होते मात्र दोन्ही विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याने सदर अपघात झाल्याचे बस चालक इंगोले ह्यांचे म्हणणे आहे.

14 मार्च रोजी नागपुर येथून चंद्रपूरला प्रवासी घेऊन येणाऱ्या बस चालकाला ह्या ठिकाणी उडणाऱ्या धुळीच्या लोटामुळे समोरचे दिसेनासे झाल्याने त्याने बस नियंत्रित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र रस्त्याच्या कडेला चढ्ढा ट्रान्सपोर्टचे ट्रक अनधिकृतपणे उभे असल्याने व धुळीमुळे बस चालकाला समोरचे दिसत नसल्याने बसने ट्रक ला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की ह्या अपघातात बस वाहक संदीप वनकर ह्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यु झाला तर 13 प्रवासी जखमी झाले असुन त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.

पैशाच्या जोरावर चंद्रपूर जिल्ह्यातील वाहतूकदार मस्तवाल झाले असुन महामार्ग आपल्या मालकीचे असल्याच्या तोऱ्यात बेधुंद वाहतूक तसेच मन मानेल तिथे रस्त्याच्या कडेची जागा वाहनतळ असल्याच्या थाटात अनधिकृतपणे कुठेही अवजड वाहने उभी ठेवतात. सर्वत्र ही स्थिती दिसत असुन ह्यामुळे अपघातांच्या कित्येक घटना घडल्याने बऱ्याच लोकांना प्राणाला मुकावे लागले तरीही परिवहन विभागाचे अधिकारी तसेच वाहतूक पोलिस ह्या मुजोर व्यावसायकांविरुद्ध कुठलीही कठोर कारवाई करत नसल्याने भविष्यात अनेकांना आपल्या प्राणाचे बलिदान करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर घटनेत केवळ ट्रान्सपोर्ट व्यावसायिक दोषी नसुन गलेलठ्ठ पगार घेऊनही कर्तव्यात कसुर करणारे प्रशासनिक अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्यावर देखिल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये