एलपीजी सिलिंडरची किंमत प्रत्येक सिलिंडरमागे 200/ रुपयांनी कमी करण्याचा घेतला निर्णय
पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यात प्रति सिलिंडर 200 रुपये अनुदान यापुढेही मिळत राहील
चांदा ब्लास्ट :
केंद्र सरकारने 75 लाख अतिरिक्त उज्ज्वला जोडण्यांनाही दिली मंजुरी, यामुळे उज्ज्वला योजनेच्या एकूण लाभार्थींची संख्या 10.35 कोटींवर जाईल
देशभरातील कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत लक्षणीय कपात करण्याची घोषणा केली आहे. 30.08.2023 पासून देशभरातील सर्व बाजारपेठांमध्ये 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी होईल. उदाहरणार्थ, दिल्लीत या निर्णयामुळे 14.2 किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत सध्याच्या 1103 रुपये प्रति सिलेंडरवरून कमी होऊन 903 रुपये प्रति सिलिंडर इतकी स्वस्त होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशातील माझ्या कोट्यवधी भगिनींना ही भेट आहे. लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि गरीब तसेच मध्यमवर्गीयांना लाभ होईल यासाठी आमचे सरकार नेहमी शक्य ते सर्व प्रयत्न करेल.”
पंतप्रधान उज्वला योजनेच्या लाभार्थी कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या प्रति सिलिंडर 200 रुपयांच्या विद्यमान अनुदानाव्यतिरिक्त ही कपात असून हे अनुदान सुरूच राहील. त्यामुळे उज्वला योजनेच्या लाभार्थी कुटुंबासाठी दिल्लीत या कपातीनंतर प्रभावी किंमत 703 रुपये प्रति सिलिंडर असेल.
देशात 31 कोटी पेक्षा जास्त घरगुती एलपीजी ग्राहक आहेत, ज्यात 9.6 कोटी उज्वला योजनेची लाभार्थी कुटुंबे आहेत आणि या कपातीमुळे देशातील सर्व एलपीजी ग्राहकांना दिलासा मिळेल. पंतप्रधान उज्वला योजनेचे प्रलंबित अर्ज मंजूर करण्यासाठी आणि सर्व पात्र कुटुंबांना ठेव मुक्त कनेक्शन प्रदान करण्यासाठी, सरकार लवकरच एलपीजी जोडणी नसलेल्या गरीब कुटुंबातील 75 लाख महिलांना पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत जोडणी पुरवण्यास सुरुवात करेल. .यामुळे पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत एकूण लाभार्थ्यांची संख्या 9.6 कोटींवरून 10.35 कोटी पर्यंत वाढेल.
नागरिकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार सध्या करत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून हे निर्णय घेण्यात आले आहेत. स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात करण्यात आलेली कपात म्हणजे नागरिकांच्या स्वास्थ्याला प्राधान्य तसेच त्यांना अत्यावश्यक सुविधा किफायतशीर दरात मिळण्याची सुनिश्चिती यांना प्राधान्य देण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.
या निर्णयाबाबत आनंद व्यक्त करत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले, “जनतेला त्यांच्या उत्पन्नाचे व्यवस्थापन करताना ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो त्याची कल्पना आम्हाला आहे. अत्यावश्यक वस्तू सर्वांना किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याच्या, केंद्र सरकारच्या व्यापक ध्येयाला पाठींबा देतानाच, देशातील कुटुंबे आणि व्यक्ती यांना थेट दिलासा देण्याच्या उद्देशाने स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात ही कपात केली आहे.
स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात कपात करण्यात आल्यामुळे समाजाच्या मोठ्या भागाच्या जगण्यासाठीच्या खर्चावर सकारात्मक प्रभाव पडेल अशी अपेक्षा आहे. लोकांच्या खर्चात लक्षणीय बचत व्हावी आणि त्यातून त्यांच्या हातात खर्चासाठी शिल्लक राहणाऱ्या उत्पन्नात कौतुकास्पद योगदान देता यावे या हेतूने सरकारने हे सक्रीय पाऊल उचलले आहे.
जनतेवरील भार कमी करण्यासाठी सरकार विविध उपक्रम हाती घेत आहे आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात आज करण्यात आलेली कपात म्हणजे लोकांच्या गरजांप्रती सरकारची प्रतिसादात्मकता आणि लोकांच्या कल्याणाप्रती सरकारची अढळ निष्ठा यांचा पुरावाच आहे.