महिला अधिकाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या घटनेचा तीव्र निषेध
दोषींवर कठोर कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अंढेरा परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार वैशाली डोंगरजाळ या अधिकाऱ्यांच्या वाहनाला टिपरने धडक देण्याचा कथित प्रयत्न करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याच्या गंभीर प्रकाराचा धनगर समाज संघर्ष समितीचे युवक जिल्हाध्यक्ष समाधान मिसाळ यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या महिला अधिकाऱ्यांच्या जीवितास अशा प्रकारे धोका निर्माण करणे हा केवळ एका अधिकाऱ्यावरील हल्ल्याचा प्रयत्न नसून कायदा व प्रशासनाला थेट आव्हान देण्याचा गंभीर प्रकार असल्याचे मिसाळ यांनी म्हटले आहे. अशा घटनांमुळे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची होण्याची शक्यता असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
महिला अधिकाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणारे हे कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला, परंपरेला आणि महिलांचा सन्मान करण्याच्या मूल्यांना अजिबात शोभणारे नाही. महाराष्ट्रात महिलांचा सन्मान करण्याची परंपरा असताना कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असेही समाधान मिसाळ यांनी स्पष्ट केले.
या घटनेची तातडीने, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर लागू असलेल्या कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याच्या जीवितास धोका निर्माण करण्याचे धाडस होणार नाही, यासाठी प्रशासनाने ठोस व कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे.



