स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली नगरपंचायतीत डल्ला?
सेलूत कचऱ्याचे साम्राज्य..
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेलू : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उद्या दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना सेलू येथील विकास चौक परिसरातील मुख्य रस्त्यासह शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात कचरा व घाण दिसून येत आहे. विशेष म्हणजे याच परिसरात तहसील कार्यालय, पंचायत समितीसह अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत.
स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध होत असताना प्रत्यक्षात शहरातील स्वच्छतेची अशी अवस्था का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रितेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या नावावर येणारा निधी नेमका कुठे खर्च केला जातो, याबाबत नगरपंचायतीने नागरिकांना माहिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या उद्देशालाच सेलू शहरातील अस्वच्छतेमुळे हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी मुख्य रस्ते व सार्वजनिक परिसराची स्वच्छता होणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत का, असा सवालही नागरिकांनी केला आहे. जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांनी सेलू शहरातील स्वच्छतेच्या परिस्थितीची पाहणी करून नगरपंचायतीकडून स्वच्छता निधीच्या खर्चाबाबत जाब विचारावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रितेश पाटील यांनी केली आहे.



