खंबीर आधार : महिलांच्या सक्षमीकरणासाठी झटणारे लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
समाजाच्या प्रगतीचे खरे मोजमाप म्हणजे त्या समाजातील महिलांची सुरक्षितता, सन्मान आणि सक्षमीकरण. स्त्री सक्षम झाली तर कुटुंब, समाज आणि राष्ट्र अधिक सक्षम होते, या विचाराला कृतीची जोड देत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणारे नेतृत्व म्हणजे आमदार तथा माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार.
सुधीरभाऊंनी आपल्या सार्वजनिक जीवनात युवक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच माता-भगिनींच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य दिले. महिलांचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, स्वावलंबन, नेतृत्व विकास आणि आर्थिक सक्षमीकरण या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दूरदृष्टीने निर्णय घेतले. राज्याचे अर्थमंत्री असताना त्यांनी अर्थसंकल्पाला महिलांच्या विकासाचे प्रभावी माध्यम बनविले. महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतुदी, विविध कल्याणकारी योजना आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देत महिला सक्षमीकरणाला भक्कम आधार दिला.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. वेकोलिच्या सीएसआर निधीतून २२ जिल्हा परिषद शाळांतील ५५३ विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप, सुमारे ₹२५४.६८ कोटींच्या महिला रुग्णालयाची मंजुरी, बल्लारपूर येथे मुलींसाठी डिजिटल शाळा, मुल येथे आदिवासी मुलींसाठी शासकीय वसतिगृह तसेच एक हजार अंगणवाड्या स्मार्ट व आदर्श करण्याचे निर्णय हे महिलांच्या आणि मुलींच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरले.
जंगल परिसरातील ९० गावांतील कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा गृहिणींच्या आरोग्याचे संरक्षण आणि त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करणारा ठरला.
महिलांच्या सेवाशर्ती अधिक सन्मानजनक करण्यासाठी नव्याने सेवेत रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही प्रसूती रजेचा लाभ, ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेसाठी ₹२०० कोटींची तरतूद, महिला बचतगटांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बाजारपेठ, मुलींच्या वसतिगृहांसाठी वाढीव निधी, अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात वाढ अशा अनेक निर्णयांमुळे लाखो महिलांना थेट लाभ झाला.
महिलांना व्यावसायिक वाहनचालक म्हणून प्रशिक्षण, शासकीय कार्यालयांमध्ये ‘हिरकणी कक्ष’, मनोधैर्य, सबला, किशोर शक्ती, सुधारित बालसंगोपन, ‘माहेर’ योजना, विधवा महिलांसाठी रोजगार, तेजस्विनी प्रकल्प, स्वच्छतागृहे, तेजस्विनी बस सेवा आणि पुनर्विवाहानंतरही विधवा महिलांची पेन्शन कायम ठेवण्यासारखे संवेदनशील निर्णय हे त्यांच्या महिला सक्षमीकरणाच्या धोरणाचे उदाहरण आहेत.
विधानसभेतही त्यांनी महिलांसाठी सर्व शासकीय योजना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करणे, सायबर गुन्ह्यांविरोधात कठोर उपाययोजना, महिला सहकारी संस्थांना प्रोत्साहन, महिला लोकप्रतिनिधींसाठी प्रशिक्षण, महिलांसाठी औद्योगिक क्षेत्र उभारणी आणि महिला आयोगाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची प्रभावी मागणी केली. चंद्रपूर येथे महिलांसाठी सुरक्षित वसतिगृह मंजूर करण्यासाठीही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
महिला सक्षमीकरण हा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासाठी केवळ राजकीय विषय नसून सामाजिक बांधिलकी आहे. महिलांचा सन्मान, स्वाभिमान आणि सर्वांगीण विकास हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. पक्ष संघटनेतही त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांना नेहमीच बळ दिले असून, एक भाऊ म्हणून त्यांचा आधार आम्हाला लाभला आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
– अलका आत्राम
महामंत्री, भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश



