स्मार्ट मिटरच्या नावाखाली महावितरणकडून ग्राहकांची “व्हेरी स्मार्ट” लूटमार..!
स्मार्ट मीटर योजना बंद करण्याची काँग्रेसच्या औद्योगिक विभागाची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये वर्षानुवर्ष सुरळीत सुरू असलेले जुने मीटर कोणतीही तांत्रिक अडचण नसताना काढून घेऊन त्याऐवजी स्मार्ट मीटर बसविले जात आहे. मात्र हे स्मार्ट मीटर बसवल्यापासून पूर्वी जे बिल यायचे ते अपेक्षेपेक्षा जास्त येत असून यामुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांची होणारी “व्हेरी स्मार्ट लूटमार” थांबविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा औद्योगिक विभागाकडून महावितरणला निवेदन देण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनानुसार, गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे सुरळीत सुरू असलेले जून मीटर कोणत्याही तांत्रिक अडचणी नसतांना काढून घेऊन त्याऐवजी स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. मात्र, नव्याने बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटर मध्ये तांत्रिक दोष किंवा कॅलिब्रेशन मध्ये गंभीर त्रुटी असल्याची शंका तज्ञाकडूनही व्यक्त केली जात आहे. याचाच परिणाम असा झाला की, यामुळे शेतकरी, मजूर, गरीब व लहान व्यवसायिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. तसेच स्मार्ट मीटर बसवल्यापासून अपेक्षेपेक्षा तीन-चार पटीने वीज बिल येत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहे.
महावितरण कंपनीकडून ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना, माहिती न देता ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबवली जात आहे. आधीच महागाई, शेतीचा वाढता खर्च आणि आर्थिक अडचणीमुळे मध्यमवर्गीय व गरीब कुटुंब त्रस्त असताना त्यांच्यावर वाढीव वीज बिलांच्या अतिरिक्त बोजा लादने हा सर्वसामान्य ग्राहकांवर अन्याय आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, ग्राहक व जनतेशी चर्चा न करता थेट स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. ग्राहकांना विश्वासात न घेता आणि त्यांची परवानगी न घेता राबविली जाणारी ही मोहीम लोकशाही मूल्यांना हरताळ फासणारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्मार्ट मिटरच्या नावाखाली होणारी लूट थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस पक्षाच्या औद्योगिक विभागाकडून देण्यात आला आहे. निवेदनकर्त्यांमध्ये काँग्रेस औद्योगिक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष कमलेश निमगडे, सचिव सचिन फुलझेले, दिलीप वासेकर, दर्शना दुर्गे, रामराव पेंदोर, चेतन मांदाडे, निकेश जुवारे, गणेश कोरवते या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.



