वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणाविरोधात कारवाईला सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या बैठकीतील निर्देशानुसार वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. नागरिकांना व वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांबाबत प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दि. ७ सप्टेंबर २०२६ पासून अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात येणार असून, नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी कारवाईच्या वेळी उपस्थित राहणार आहेत. अतिक्रमण हटविताना आवश्यकतेनुसार जेसीबी, ट्रॅक्टर व सफाई कामगारांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून १० सफाई कामगार व २ ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
कारवाई सुरळीत पार पाडण्यासाठी नगरपरिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, कारवाईच्या वेळी उपस्थित राहून अतिक्रमणे हटविण्याचे काम पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वर्धा पोलिसांकडून आवश्यक बंदोबस्त देण्याची विनंती नगरपरिषद प्रशासनाने केली आहे.
दुर्गा टॉकीज चौक ते रेल्वे स्टेशन मेन रोड, बजाज चौक ते कच्ची लाईन चौक मेन रोड या प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे वाहतूक सुरळीत होण्यासह नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक नागेश कुमार चतुरकर, शहर पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस अमलदार सुहास चांदारे, सचिन भालशंकर, नवनित वानखेडे, उमेश कांबळे, मनोज काकापूरे तसेच नगरपालिकेचे संबंधित अधिकारी-कर्मचारी सहभागी राहणार आहेत.
संदिप पाटील स्वपनील खंडारे विशाल सोमवंशी रामटेके मुकिंग शेख विरसेन सिरसाट विशाल नाईक गजानन पेटकर प्रदिप मुनघाटे चेतन कहाते प्रविण बोबडे प्रितम ब्राम्हणे अशोक लोखंडे यांनी हि कार्यवाही केलेली आहे



