पत्रकार सुरक्षा कायदा तातडीने लागू करा
केंद्र सरकारकडे पत्रकार संरक्षण संघाचे विदर्भ अध्यक्ष सय्यद शब्बीर जागीरदार यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- देशभरात पत्रकारांवर वाढत असलेले हल्ले, धमक्या तसेच पत्रकारांच्या कामकाजात निर्माण केले जाणारे अडथळे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र व प्रभावी ‘पत्रकार सुरक्षा कायदा’ तातडीने लागू करावा, अशी मागणी पत्रकार संरक्षण संघाचे विदर्भ अध्यक्ष सय्यद शब्बीर जागीरदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता शासन, प्रशासन आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर निर्भीडपणे वृत्तांकन करताना पत्रकारांना अनेकदा दबाव, धमक्या आणि विविध प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पत्रकारांना त्यांच्या कर्तव्याचे पालन निर्भयपणे करता यावे, यासाठी प्रभावी कायदेशीर संरक्षण देणारी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे जागीरदार यांनी म्हटले आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1)(अ) अंतर्गत नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे. मुक्त, निर्भय आणि निष्पक्ष पत्रकारिता ही लोकशाहीच्या सुदृढतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पत्रकारांच्या व्यावसायिक स्वातंत्र्याला आणि सुरक्षिततेला कायदेशीर संरक्षण मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांवरील हल्ले, धमक्या तसेच पत्रकारितेच्या कामात अडथळा आणणाऱ्या घटनांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष कायदेशीर तरतुदी करण्यात याव्यात. पत्रकारांच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्यासाठी स्वतंत्र व प्रभावी यंत्रणा निर्माण करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पत्रकारांना सुरक्षित वातावरणात काम करण्याची हमी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.



