जिवतीतील शेतकऱ्यांना पिक विम्यासाठी ‘फार्मर आयडी’ची अट शिथिल
३१ जुलैपर्यंत अर्जाची संधी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा.संतोष इंद्राळे
जिवती :- जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२६-२७ अंतर्गत पिक विमा अर्ज करताना ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अनेक पात्र शेतकरी पिक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. या समस्येची गंभीर दखल घेत शासनाने जिवती तालुक्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आजपासून पिक विमा अर्जासाठी ‘फार्मर आयडी’ची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता ‘फार्मर आयडी’ नसलेल्या शेतकऱ्यांनाही कोणत्याही अडथळ्याविना पिक विमा पोर्टलवर अर्ज करता येणार आहे.
यंदाच्या हंगामासाठी पिक विमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे जिवती तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी आपला अर्ज भरून नैसर्गिक आपत्तींपासून आपल्या पिकाचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने सर्व कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावोगावी जनजागृती करून ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून कोणताही पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही.
“शेतकऱ्यांना कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शासन कटिबद्ध आहे. जिवती तालुक्यात ‘फार्मर आयडी’ची अट शिथिल केल्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना विनाअडथळा अर्ज करता येणार आहे. शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घेत ३१ जुलैपूर्वी पिक विमा अर्ज भरून आपल्या पिकाचे संरक्षण करावे.
माधुरी जी गावडे,तालुका कृषी अधिकारी जिवती.



