जैन संतांच्या मंगल प्रवेशाने सेलू नगरी झाली मंगलमय
चातुर्मासाची उत्साहात सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
अध्यात्म सम्राट परमपूज्य आचार्य भगवंत श्रीमद् विश्वरत्न सागरसुरीश्वरजी व अन्य पाच मुनीराज यांचा नागपूर चातुर्मासिक मंगल प्रवेशकरीता आज, १६ जुलै रोजी सेलू शहरात अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात आगमन झाले.संतांच्या आगमनाने सेलू शहर मंगलमय झाले होते त्यामुळे जैन बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून आला होता.
सकाळी ७.३० वाजता जैन मंदिरात प्रवेश झाल्यानंतर समाजातर्फे जंगी स्वागत करण्यात आले. संतवृंदांची शोभायात्रा काढण्यात आली. जयघोषाने या मिरवणुकीचे शहरात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील जैन समाजाच्या वतीने प्रमुख मार्गांवर गुरुभगवंतांचे स्वागत करण्यात आले. ही शोभायात्रा मार्गक्रमण करत श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिर उपाश्रयात पोहोचली तिथे प्रवचन केल्यानंतर दुपारी ३ वाजता दफ्तरी यांच्या निवासस्थानी आयोजित सत्कार समारंभाची सुरुवात महिला मंडळाच्या मंगल स्वागतगीताने झाली. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पूज्य मुनिराज म्हणाले की, “जगातील प्रत्येक व्यक्ती सुखाच्या शोधात आहे, परंतु खऱ्या सुखाची ओळख नसल्यामुळे माणूस बाह्य भौतिक वस्तूंमध्ये सुख शोधतो. अशा गोष्टी सुख देण्याऐवजी माणसाला गुलाम बनवतात. भगवंतांच्या शिकवणुकीनुसार, खरे सुख हे सद्गुणांमध्येच दडलेले आहे.”
मुनिराज यांनी श्रीकृष्णाचे उदाहरण देत उपस्थितांना आत्मशुद्धी करावी असा संदेश दिला. “आजची तरुण पिढी शरीराला जास्त महत्त्व देताना दिसते, मात्र त्याऐवजी आत्मा आणि सद्गुणांच्या जोपासनेला प्राधान्य दिले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले. आगामी चातुर्मासाच्या चार महिन्यांत गुणांच्या खऱ्या अर्थाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या मंगल सोहळ्याप्रसंगी प्रामुख्याने ९२ वर्षाच्या श्रीमती हिराबाई दफ्तरी,जैनेंद्र दफ्तरी,शैलेंद्र दफ्तरी, सुरेंद्र भंडारी, महेंद्र भंडारी, नवीनचंद चौधरी,नरेंद्र दफ्तरी,अनिलचंद चौधरी, त्रिशूल चौधरी आणि वरुण दफ्तरी, विनीत दफ्तरी, यश दफ्तरी तर महिलामध्ये सौ. रेखा दफ्तरी, सौ. भारती भंडारी, सौ. बरखा चौधरी, बेदमोहता परिवार, भंडारी परिवार, चौधरी परिवारातील लहान मुलामुलीसह मोठ्या संख्येने श्रावक-श्राविका उपस्थित होते. सेलू नंतर त्यांचा रात्री केळझर येथील धम्मभूमीत मुक्काम राहणार आहे व दिनांक १७ तारखेला बुटटीबोरी येथील जैन मंदिरात प्रवचन करून पुढील कार्यक्रम गोलछा फार्म मध्ये प्रवचन होणार आहे. याचा शेवट चातुर्मासकारिता रामदासपेठ येथील जैन मंदिरात होईल अशी माहिती शैलेंद्र दफ्तरी यांनी दिली.



