‘एक पेड पिता के नाम’ उपक्रमातून पितृस्मृतीला हरित अभिवादन
वरोऱ्याचा 'पितृस्मृती वृक्षारोपण अभियान' हा अभिनव, पवित्र आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम _ नगराध्यक्षा अर्चना ठाकरे

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी.
राजेंद्र मर्दाने, वरोरा.
वरोरा : वडील हे प्रत्येकाच्या जीवनातील आधारस्तंभ असतात. ‘एक पेड माँ के नाम’ या देशव्यापी वृक्षारोपण अभियानाला प्रतिसाद मिळत असतानाच, पितृस्मृती जपणारी ‘एक पेड पिता के नाम’ ही अभिनव संकल्पना समाजात नवा आदर्श निर्माण करणारी आहे. हा उपक्रम केवळ पर्यावरण संवर्धनापुरता मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी जपणारा आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे, असे प्रतिपादन वरोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांनी केले.
ओशनिक बहुउद्देशीय संस्था, आनंदवन मित्र मंडळ, आनंदम् मैत्री संघ, वरोरा-भद्रावती-चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघ आणि जय हिंद सैनिक संस्था, स्मृती वृक्षारोपण आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत पू. श्री. गुरुचरणजी अमरनाथजी मर्दाने यांच्या पावन स्मृतीप्रीत्यर्थ मालवीय वॉर्डातील आकाश नगर येथे ‘पितृस्मृती वृक्षारोपण अभियान-२०२६’ आयोजित करण्यात आले. ‘एक वृक्ष, एक शाश्वत स्मृती, एक हरित भविष्य’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी नगर परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती योगिता नेरकर, ख्यातनाम चित्रकार प्रल्हाद ठक आणि नगरसेवक तथा ओशनिक संस्थेचे उपाध्यक्ष बंडू देऊळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अर्चना ठाकरे म्हणाल्या, की वडिलांच्या स्मृतीत लावलेले झाड जसजसे वाढेल, तसतसा त्याचा अभिमान प्रत्येक कुटुंबाला वाटेल. अशा उपक्रमांमधून पुढील पिढीही पर्यावरण संवर्धनाचा वारसा पुढे नेईल. वरोरा शहराला विविध क्षेत्रांत मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या अनेक व्यक्तींचे कार्य आजही तळागाळातील समाजापर्यंत पोहोचलेले नाही. अशा व्यक्तिमत्त्वांचा शोध घेऊन त्यांचे योगदान समाजासमोर आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विधायक कार्यात नगर परिषद सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
उपाध्यक्षा योगिता नेरकर म्हणाल्या, की झाडे ही निसर्गाची अमूल्य देणगी असून मानवाच्या अस्तित्वाचा आधार आहेत.’ पितृस्मृती वृक्षारोपण ‘ ही अत्यंत स्तुत्य संकल्पना आहे. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. वृक्षारोपण म्हणजे केवळ पर्यावरण संवर्धन नव्हे, तर भविष्यासाठी आशेचे बीज पेरणे होय.
बंडू देऊळकर यांनी दिवंगत पू.गुरुचरणजी मर्दाने यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले, की ते अत्यंत अभ्यासू आणि विद्वान व्यक्तिमत्त्व होते. अमरावती येथे शिक्षण घेत असताना कविवर्य सुरेश भट हे त्यांचे रूममेट, तर माजी राज्यपाल रा. सू. गवई हे त्यांचे कनिष्ठ विद्यार्थी होते. प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांत उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अनेक वर्षांपासून वृक्षारोपणाची परंपरा सुरू असून संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांचीही त्यांनी माहिती दिली.
ख्यातनाम चित्रकार प्रल्हाद ठक यांनी ‘स्मृती वृक्ष’ अभियानाचे कौतुक करताना वाढते तापमान आणि घटणारी भूजल पातळी लक्षात घेता वृक्षसंवर्धनाची गरज अधोरेखित केली. गावातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना सहभागी करून आतापर्यंत पाच हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करून त्यांचे यशस्वी संवर्धन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रास्ताविकात ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेंद्र मर्दाने यांनी उपक्रमामागील उद्देश, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करीत दिवंगत पू. गुरुचरणजी मर्दाने यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन व पू.गुरुचरणजी मर्दाने यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध संस्थांच्या वतीने नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या तसेच योगिता नेरकर, प्रल्हाद ठक आणि बंडू देऊळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपआपल्या वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आंबा, मोह, अर्जुन, जांभूळ, आवळा, पिंपळ, बकुळ, पारिजात, चाफा,मधुमालती, बहावा आणि कडुनिंब यांसारख्या देशी वृक्षांची लागवड केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मर्दाने यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी केले.
याप्रसंगी माजी प्राचार्य बळवंतराव शेलवटकर, बीएसएनएल चंद्रपूरचे लेखा अधिकारी शरद नन्नावरे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत देशमुख, प्रकाश पोहाणे, भास्कर गोल्हर, दादाराव दडमल, शेख शफी, खेमचंद नेरकर, गजानन उमरे, अशोक बावणे तसेच सुमित्रा मर्दाने, पार्वती मर्दाने यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न.प. चे वित्त व नियोजन सभापती राहुल देवडे, तुषार मर्दाने, आकाश पोहाणे, गोपाल पोंदे, अमोल देऊळकर, दिलीप पेंदोर, स्मृती वृक्षारोपण समितीचे पदाधिकारी, सदस्य आदींनी अथक परिश्रम घेतले.



