ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घूसमध्ये विकासाची पोलखोल! तुंबलेल्या गटारी, तुटलेले स्लॅब आणि घरांमध्ये शिरलेले सांडपाणी

नगर परिषदेच्या तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह

चांदा ब्लास्ट

घुग्घूस :_ मुसळधार पावसाने घुग्घूस नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ११ मधील विकासकामे आणि नगर प्रशासनाच्या तयारीची वास्तविकता समोर आणली आहे. रविवारी (२८ जून) दुपारी झालेल्या पावसात भूमिगत गटारी तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. परिस्थिती इतकी गंभीर झाली की नगर परिषदेचा एकही कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही. अखेर स्थानिक नागरिकांनाच गटारीतील कचरा आणि अडथळे काढून पाण्याचा निचरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यापूर्वी गटारींची साफसफाई झाल्याचा दावा केवळ कागदोपत्रीच राहिला. प्रत्यक्षात ना गटारींची प्रभावी साफसफाई करण्यात आली, ना तुटलेले स्लॅब आणि झाकणे दुरुस्त करण्यात आले. अनेक ठिकाणी लोखंडी झाकणे चोरीला गेली असून काही नागरिकांकडून रस्त्यावरील कचरा थेट गटारीत टाकला जात असल्याने समस्या अधिकच गंभीर बनली आहे.

सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होत आहे की, ज्या गटारीतून लोकप्रतिनिधींच्या घराकडे जाणारा मार्ग आहे, त्याच गटारीची अशी दयनीय अवस्था असेल तर इतर भागांची परिस्थिती किती गंभीर असेल, याचा सहज अंदाज बांधता येतो. यापूर्वीही माध्यमांनी या गटारीच्या दुरवस्थेचा मुद्दा ठळकपणे मांडला होता, मात्र नगर परिषद प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही.

यामुळे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अभियंता आणि स्वच्छता विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी गटारींची साफसफाई आणि दुरुस्ती का करण्यात आली नाही? आणि केली असेल तर त्याचा परिणाम प्रत्यक्षात का दिसून आला नाही?

याचबरोबर गटार बांधकामाच्या गुणवत्तेवरही संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांचा प्रश्न आहे की, कंत्राटदाराने बांधकामात हलगर्जीपणा केला का? गटार बांधल्यानंतर अल्पावधीतच त्याची अशी अवस्था झाली असेल तर त्याला जबाबदार कोण? कंत्राटदाराला पूर्ण पैसे अदा झाले असल्यास दुरुस्तीचा खर्च कोण उचलणार? पुन्हा जनतेच्या कराच्या पैशातून खर्च केला जाणार का, की विकासाच्या नावाखाली नवीन निविदा काढून सरकारी निधीचा अपव्यय होणार?

प्रभाग क्रमांक ११ मधील रहिवासी विकास खाडे यांनी या संदर्भातील व्हिडिओ शेअर करत सांगितले की, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दोन्ही लोकप्रतिनिधी वॉर्डातील मूलभूत समस्यांच्या निराकरणाबाबत गंभीर नाहीत. त्यांच्या मते, गटार बांधकामाच्या सुरुवातीपासूनच त्याची अवस्था खराब होती; मात्र नगर प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कधीही ठोस पावले उचलली नाहीत. वेळेत दुरुस्ती आणि साफसफाई न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, नगर परिषद आणि संबंधित अधिकारी या इशाऱ्याची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करतील का, की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतील? सध्या प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये