बालकांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे काळाची गरज – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
अंगणवाडी केंद्रांना शैक्षणिक पुस्तक संचांचे वितरण ; संचासाठी क्रिएटिव्ह गॅलिलिओ कंपनीचे जिल्ह्यास सहकार्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : बालकांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. वाचन संस्कृतीच्या माध्यमातून बालकांची भाषा, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता व विचारक्षमता विकसित होत आहे. जिल्ह्यातील बालकांच्या सर्वांगीण विकासात अंगणवाडी सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांतील बालकांच्या शैक्षणिक, बौद्धिक व सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने साई मंदिर, वर्धा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते शैक्षणिक पुस्तक संचाचे वितरण करण्यात आले, त्यावेळी डॉ.भोयर बोलत होते. कार्यक्रमाला गुरुकुंज मोझरीचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त जनार्दन बोथे, माजी खासदार रामदास तडस, नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, गॅलिलिओ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष दोषी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसंगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसंगे यांनी केले. पुस्तकांच्या माध्यमातून बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, शब्दसंग्रह वाढविणे, एकाग्रता व आकलन क्षमता विकसित करणे तसेच नैतिक मूल्यांचे संवर्धन करण्यास मदत होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शैक्षणिक पुस्तक संचांचे विमोचन तसेच जिल्ह्यातील विविध अंगणवाडी केंद्रांना शैक्षणिक पुस्तक संचांचे वितरण करण्यात आले.
जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमधील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रिएटिव्ह गॅलिलिओ कंपनीच्या वतीने सदर शैक्षणिक पुस्तक संच उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याबद्दल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष दोषी यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संजय गाते, सुनील गफाट, निलेश किटे, वैशाली येरावार, सुभाष राठी, स्वाती गव्हाणे, प्रदीप तलमले, विलास आगे, निलेश पोहेकर, जयश्री गफाट, सोनाली कलोडे, पृथ्वीराज शिंदे, सरस्वती मडावी तसेच महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते



