शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय लागवड करू नका _ गोविंद ठाकूर तालुका कृषी अधिकारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
११ राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून अनेक भागांत प्रमखतेने पावसाने हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसानंतर बळीराजा सुखावला असला, तरी कृषी विभागाने शेतकऱ्यांना एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी केवळ पहिल्या पावसावर विसंबून घाईघाईने पेरणी करू नये. जमिनीमध्ये किमान १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यावर आणि पुरेशी ओल निर्माण झाल्यावरच पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांनी केले आहे. कोरपना तालुक्यात खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये अंदाजे ३९६८४ हे. एकूण नियोजित पेरणी क्षेत्र आहे त्यामध्ये मुख्य पिके म्हणुन कापूस अंदाजे ३०४७० हे., सोयाबीन अंदाजे ४९१७हे. आणि तूर अंदाजे ३३७१ हेक्टरवर पेरणी केली जाते. सदरील पिके कोरडवाहू असल्यामुळे हे पिके १०० मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये असे.
दरवर्षी मान्सूनच्या सुरुवातीला अनेक शेतकरी पहिल्या दोन-तीन मोठ्या पावसांनंतर लगेचच पेरणी उरकून घेतात. मात्र, यामुळे खालील मोठे नुकसान होऊ शकतेः जर सुरुवातीच्या पावसानंतर हवेत खंड पडला (पाऊस लांबला), तर जमिनीत पुरेशी ओल नसल्याने बियाणे जळून खाक होते. परिणामी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येते, ज्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. पुरेशी ओल नसेल तर बियाण्याची उगवण नीट होत नाही आणि पिकांची संख्या विरळ राहते.
जेव्हा तुमच्याभागात एकूण १०० मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडेल, तेव्हाच जमीन पेरणीयोग्य होते. पाऊस पडल्यानंतर जमीन किमान ६ ते ७ इंच (१५ ते २० सेंमी) खोलीपर्यंत ओली झाली आहे का, याची खात्री करा. बियाणे आणि खतांचा खर्च पाहता शेतकऱ्यांनी कोणतीही जोखीम पत्करू नये. घाईगडबडीत पेरणी करून बियाणे वाया घालवण्यापेक्षा, पाऊस चांगला स्थिरावू द्यावा आणि मगच पेरणी करावी. यामुळे पिकांची उगवण उत्तम होईल आणि आर्थिक नुकसान टळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अंदाजाचा वेध घेत, १०० मिमी पावसाची प्रतीक्षा करावी आणि त्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कोरपना तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांनी केले आहे.



