ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वीर अहिल्यादेवींनी सव्वीस परघनांचे राज्य करीत आदर्श राज्यकारभार चालविला – सीमा गोरडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सव्वीस परघनांचे राज्य करीत २९ वर्षै आदर्श राज्यकारभार चालविला. त्यागांनाही अभिमान वाटावा इतका मोठा त्याग अशा जागतिक कीर्तीच्या राजमाता, विश्वमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा होता. त्या अखंड भारतभूमीच्या मानबिंदू होत्या. राजमाता अहिल्यादेवींचा लोककल्याणकारी इतिहास हा आतापर्यंतचा राज्यकर्त्यांनी इतिहास जमा केला. त्यामुळे खरा इतिहास पुढे आणण्याची गरज आहे.

असे प्रतिपादन मांगलादेवी येथे आयोजित राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नृत्य स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी वर्धा येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. सीमा राजू गोरडे यांनी केले. यावेळी मंचकावर आयोजक सविता वडे,अध्यक्ष धनगर समाज सेवा संस्था, प्रमुख अतिथी म्हणून पद्माकरराव ढोमणे, सामाजिक कार्यकर्त्या सौ.प्रमोदिनी मुंदाने, स्वप्निल ढोमणे, नितीन गोरले, अनिरुद्ध मुंदाने, सौ.पुष्पलता खिपसरा, प्रमोद पुनसे,उघडे सर, चोपकर सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंचकावरील मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना सौ. सीमा गोरडे म्हणाल्या की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात २९ वर्ष लोककल्याणकारी राज्य केले.

परंतु त्याच अहिल्यामातेच्या हातात केवळ पिंड देऊन धार्मिकतेच्या चौकटींमध्ये त्यांना बंदिस्त करून टाकले, अशी खंत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली. ३१ मे १७२५ रोजी माणकोजी शिंदे व सुशिलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबात अहिल्यादेवी नावाचे रत्न जन्माला आले. अहिल्यादेवींचे वडील मानकोजी शिंदे हे शूर पराक्रमी होते. लहानपणापासूनच अहिल्यादेवींना त्यांच्या वडिलांनी शौर्याचे धडे दिले. भालाफेक, तलवारबाजी, पोहणे, घोडा चालवणे या सर्व पराक्रमाने अहिल्यादेवी होळकर वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापर्यंत सर्व कलांमध्ये पारंगत होत्या. त्याच काळात अवघ्या आठव्या वर्षी अहिल्यादेवींचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला. पतीच्या निधनानंतर चूल आणि मूल या समाज व्यवस्थेचे बंधन तोडून संघर्ष व स्त्रीचे सामर्थ्य काय असते, हे संपूर्ण जगाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी दाखवून दिले.

अहिल्यादेवींनी सत्याचे मंत्र वापरून विकासाचे तंत्र या देशाच्या मातीमध्ये राबविले. त्यांच्या राज्यकारभारामध्ये कुणीच उपाशी व बेरोजगार नव्हता. त्या काळात सतीची प्रथा त्यांनी बंद केली. कारण विधवा महिलेला त्यांच्या पतीच्या निधनानंतर जगण्याचा अधिकार नव्हता. तो सुद्धा त्यांनी मोडीत काढला. राजमाता अहिल्यादेवींचा खरा इतिहास जमा झालेला आहे.त्यामुळे तो इतिहास आता पुढे येणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे पुरुषांमध्ये जगात सर्वोत्तम राजे होते.त्याच पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सुद्धा जगाच्या पाठीवर स्त्रियांमधल्या सर्वोत्तम पहिल्या राज्यकर्त्या होत्या. हे विसरता येणार नाही. यावेळी नृत्य स्पर्धेत उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना पारितोषिक देण्यात आले.

संचालन श्रेया उघडे यांनी केले. यावेळी सुनंदा उघडे, सारिका ताल्हन, मनस्वी पुनसे,गुंजन उघडे, गुंजन वडे,ईश्वर वडे, गुंजन कुंभारखाणे, आरोही ढोमणे, कल्याणी महल्ले, आरुषी राऊत, रुचिका उघडे ,प्रतीक्षा तुपट, निकिता पुनसे, अनैया वडे, श्रेया उघडे, श्रद्धा दाढे,सुहानी राव, अंकिता बोबडे, मानवी नहार, गुंजन कोल्हे, खुशी राऊत,स्वप्ना कुडमते,आराध्या केराम,आर्या कुटे आदीनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये