गडचांदूरमध्ये सर्वपक्षीय विद्यार्थी आक्रोश आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे
दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ आज गडचांदूर येथील गांधी चौकात सर्वपक्षीय ‘विद्यार्थी आक्रोश आंदोलन’ आयोजित करण्यात आले. या आंदोलनात विविध राजकीय पक्ष, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आंदोलनादरम्यान गांधी चौकातून शहरात घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करावे, शिक्षण क्षेत्रातील अन्याय थांबवावा तसेच दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यानंतर आंदोलकांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात जाऊन ठाणेदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांवरील दडपशाहीचा निषेध करत संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
या आंदोलनात उपनगराध्यक्ष संजय मेंढी, अरुण निमजे, विठ्ठलराव थिपे, तुषार बावणे, सचिन भोयर, सागर ठाकुरवार, प्रा. आशिष देरकर, विक्रम येरणे, मनोज भोजेकर, राहुल उमरे, शैलेश लोखंडे, नवाज बेग, शेख अहमद भाई, विवेक येरणे, अक्षय गोरे, देविदास मुन यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी आणि शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.



