लाल नाला धरणातून २९ मे रोजी नदीपात्रात पाणी सोडणार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील कोरा गावाजवळ असलेल्या लाल नाला धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत चंद्रपूर पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला अधिकृत पत्राद्वारे माहिती दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या मंजुरीनंतर दिनांक २९ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता लाल नाला धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात २० घनमीटर प्रति सेकंद (20 घमी/से) विसर्गाने पाणी सोडण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता ज.स. सिंह यांनी कळविले आहे.
नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी तसेच संबंधित ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने पूर्वसूचना जारी केली असून संबंधित तहसीलदारांना देखील आवश्यक निर्देश देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासन व भद्रावती तालुक्याच्या वतीने तहसीलदार राजेश भांडारकर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठच्या गावांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याचे तसेच नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



