ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भरती रखडल्याने युवकांवर बेरोजगारीचे संकट; गार्ड बोर्ड भरती तातडीने करा – आ. जोरगेवार

कामगार मंत्री यांची मंत्रालयात बैठक, सकारात्मक चर्चा

चांदा ब्लास्ट

भरती रखडल्याने जिल्ह्यातील अनेक पात्र युवकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले असून, गार्ड बोर्ड भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या कामगारांच्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा ठामपणे मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले.

पावसाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या कामगारांच्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मुंबई मंत्रालयात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक भरती, कंत्राटी कामगारांचे प्रश्न, गार्ड बोर्ड नोंदणी प्रक्रिया, कामगारांना घरे यांसह अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडण्यात आले. यावेळी सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

या बैठकीला कामगार विभागाचे उपसचिव स्वप्निल कापडणीस, सहआयुक्त शिरीन लोखंडे, अवर सचिव दिलीप वनिरे, चंद्रपूर सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष प्र. भि. कावळे आदींची उपस्थिती होती.यावेळी कामगारांना हक्काचे घर देण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलण्यात यावे, असे आमदार जोरगेवार म्हणाले. पोलिस भरतीप्रमाणे गार्ड बोर्ड भरती केली जात आहे. हे कामगारांना मान्य नाही. त्यामुळे यातील अटी शिथिल करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. मंत्री महोदयांनीही याबाबत सकारात्मकता दाखवत लवकरच तसा जीआर काढण्याचे मान्य केले आहे. अनेक आस्थापने गार्ड बोर्ड नोंदणी करत नाहीत; अशा आस्थापनांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

यावेळी आ. जोरगेवार यांनी चंद्रपूर सुरक्षा रक्षक मंडळामार्फत विविध आस्थापनांना सुरक्षा रक्षक पुरविले जातात. मात्र, मागील काही काळापासून सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया रखडलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र व बेरोजगार तरुण रोजगारापासून वंचित राहिले असून, ते भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच अनेक आस्थापनांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

याशिवाय, मंडळामध्ये ‘निरीक्षक’ संवर्गातील दोन पदे रिक्त असल्याकडे लक्ष वेधत, भरती प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत राबविण्यासाठी या पदांवर तातडीने योग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले.

कामगार विभागाने आतापर्यंत किती आस्थापनांची तपासणी केली, नोंदणीकृत नसलेल्या आस्थापनांवर काय कारवाई झाली, तसेच सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित नोंदणीची स्थिती काय आहे, याबाबत आ. जोरगेवार यांनी माहिती मागितली.

चंद्रपूरसारख्या औद्योगिक जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक कंत्राटी कामगार कार्यरत असताना कामगार विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. ही पदे तातडीने भरण्याबरोबरच कामगारांना किमान वेतन, पीएफ आणि ईएसआयसीच्या सुविधा मिळत आहेत का, याची प्रभावी तपासणी यंत्रणा उभी करण्याची मागणी त्यांनी केली.

प्रलंबित नोंदी पूर्ण करण्यासाठी विशेष नोंदणी शिबिर आयोजित करणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाईसाठी स्वतंत्र ‘कृती दल’ स्थापन करणे, नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू करणे, तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या उद्योगांवर परवान्यांशी संबंधित निर्बंध आणण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये