सेलूतील अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा
२०११ पूर्वीची बांधकामे होणार नियमित!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेलू तालुक्यातील अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. २०११ पूर्वीची अतिक्रमित घरे आता नियमित केली जाणार असून, यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला घरांचा प्रश्न सुटणार आहे. तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांनी यासंदर्भात माहिती देत अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा दिला आहे.
शासनाच्या धोरणानुसार, १ जानेवारी २०११ पूर्वी झालेली निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या निर्णयामुळे ज्या नागरिकांनी सरकारी जागेवर आपली घरे बांधली होती, त्यांना आता मालकी हक्क ज्यांना अतिक्रमित केलेल्या जागेमध्ये ५०० चौ. फूट ही मोफत व उरलेली जागेला शासकीय बाजारमुल्यानुसार १० टक्के किंमत चुकवावी लागेल तसेच यामध्ये १५०० चौ. फूट पर्यंत नियमित केली जाईल यापेक्षा जास्त अतिक्रमित जागा असेल ती जागा सरकारी जमा करून अनधिकृत समजून ताबा काढून घेतल्या जाईल अशा प्रकारे आदेश निघाला आहे.
या प्रक्रियेबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांनी सांगितले की, पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा ३१ डिसेंबर २०२६ पर्यन्त लाभ घ्यावा यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी व शहरी भागातील नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे अर्ज मुदतीच्या आत करायचा आहे. यामुळे गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळण्यास मदत होईल आणि अनधिकृत बांधकामांचा शिक्का पुसला जाईल.
या निर्णयामुळे सेलू परिसरातील शेकडो कुटुंबांमध्ये उत्साहाचे व संभ्रमाचे वातावरण आहे कारण गरीब कुटुंब ५०० चौ. फूट विनामूल्य आहे पण अतिरिक्त जागेसाठी राशी कुठून आणायची अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली आहे. प्रशासनाकडून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



