बुद्धाचा संदेश आजच्या काळाची गरज – पत्रकार कांबळे यांचे प्रतिपादन
छत्रपती शिवाजी महाराज टी-पॉईंट, सावंगी मेघे येथे बुद्ध जयंतीनिमित्त प्रबोधन मेळावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा — छत्रपती शिवाजी महाराज मित्र परिवार, सावंगी मेघे (वर्धा) यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त खीरदान वाटप व प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन प्रेमदास मोखाडे व वर्षाताई मोखाडे यांनी केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदनेने करण्यात आली. यावेळी मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार पत्रकार कांबळे यांनी आपल्या प्रबोधनातून बुद्ध जयंतीचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “गौतम बुद्धांचे धम्म तत्त्वज्ञान विश्वात शांतता निर्माण करणारे आहे. आज देशाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे.” त्यांनी पुढे बुद्धांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या मूल्यांना भारतीय संविधानात प्रतिष्ठा देऊन बुद्धांच्या विचारांना संवैधानिक अधिष्ठान मिळवून दिले, असेही त्यांनी नमूद केले. बुद्ध, फुले, आंबेडकर हे परिवर्तनवादी, समतावादी व विज्ञाननिष्ठ विचारसरणीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात बुद्ध-भीम गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकण्यात आली. “सारे भारत की शान और दुनिया में नाम, बुद्ध-भीम जैसा…” या गीताने वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना खीरदानाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी मित्र परिवारातील कार्यकमाला प्रमुख उपस्तिथी गणेश भाऊ इखार. रमेश भाऊ साटोणे आनंद सोनटक्के प्रेम सिंग राठोड विकेश वानखेडे सुनील शास्त्रकार प्रफुल देशमुख अजय जवादे इत्यादी सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.



