गोंडपिपरी तालुक्यातील जनहितांच्या प्रश्नांवर काँग्रेसचे प्रशासनाला साकडे
निवेदनातून विविध समस्या सोडविण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे.
गोंडपिपरी :- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, गोंडपिपरीच्या वतीने तालुक्यातील विविध जनहिताच्या व शेतकरी हिताच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तहसीलदार शुभम बहाकर यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी यांना सोमवारी सविस्तर निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये संजय गांधी निराधार, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन आदी योजनांतील लाभार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेले अनुदान तातडीने वितरित करण्याची मागणी करण्यात आली. तसेच गोंडपिपरी तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, नुकसानभरपाईची मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टर करण्यात यावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय सूरजागड परिसरातून गोंडपिपरी मार्गे धावणाऱ्या ओव्हरलोड हायवा वाहनांवर कठोर कारवाई करून वेगमर्यादा निश्चित करावी, गोंडपिपरी शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, धाबा ते गोंडपिपरी मार्गावरील जंगल परिसरातील अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खोदकाम करून मुरमाचा साईड भरणा करण्यात यावा, तसेच धानाचे बोनस दरवर्षीप्रमाणे यंदाही लवकर मंजूर करण्यात यावे, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक रेचनकर, शहर अध्यक्ष राजू झाडे, देविदास सातपुते, बालाजी चनकापुरे, साईनाथ कोडापे, सारनाथ बक्षी, धीरेंद्र नागपुरे, आशिष निमगडे आणि जयेंद्र अवथरे उपस्थित होते.



