‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनआशीर्वाद
सेवा संकल्प अभियानांतर्गत चंद्रपूर भाजप महानगर कार्यालयात आ. जोरगेवार यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन

चांदा ब्लास्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध सेवाभावी आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी चंद्रपूर येथील भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालयात ‘आशीर्वादाचा दिवा’ हा उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह उपाध्यक्ष बलराम डोडानी, महामंत्री रवींद्र गुरनुले, सविता दंढारे, अॅड. सुरेश तालेवार, प्रिन्स प्रसाद, अक्षय शेंडे, कौसर खान, नीलिमा वनकर, लता ब्राह्मणे, सोनाली इटनकर, रिना साखरकर, भावना बारसागडे, सपना सातपुते, सविता ब्राह्मणे, मीनाक्षी उपगन्लावार, छाया चवरे आदींची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या निष्ठावान जनसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच जनतेच्या आशीर्वादाची सामूहिक अभिव्यक्ती करण्याच्या उद्देशाने ‘आशीर्वाद का दिया’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून देशसेवेसाठी समर्पित असलेल्या नेतृत्वाप्रती कृतज्ञता आणि सद्भावना व्यक्त करण्यात आली.
सायंकाळी ७ वाजता या उपक्रमाला सुरुवात झाली. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी आपल्या घरांमध्ये दीप प्रज्वलित करून या अभियानात सहभाग नोंदविला. चंद्रपूर महानगर कार्यालयातही दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दीप प्रज्वलित करून उपक्रमात सहभाग घेतला.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ काळ देशसेवेला समर्पित केला आहे. त्यांच्या कार्याला जनतेचा आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळाव्यात, या भावनेतून ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सेवा, समर्पण आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून सुरू असलेल्या या अभियानात समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आगामी महिनाभर विविध सामाजिक, सेवाभावी आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जनसेवेचा संकल्प अधिक दृढ करण्यासोबतच समाजातील विविध घटकांपर्यंत सेवाकार्य पोहोचविण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.



