वढोली येथे युवकावर चाकूने हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथे रविवारी (दि.१९) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नागमंदिर परिसरात तीन युवकांमध्ये झालेल्या वादातून एकावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेत वैभव साईनाथ आळे (वय २०) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. मात्र आज (दि.२०) जखमी वैभवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जुन्या वादातून वढोली येथे शाब्दिक वाद निर्माण झाला.त्याचे रुपांतर मारहाणीत झाले.नागमंदिराजवळ काही युवक नेहमीप्रमाणे मैत्रीपूर्ण चर्चेसाठी बसले होते.जुन्या किरकोळ कारणावरून वैभव व त्याचा मित्र व परिमल यांच्यामध्ये वाद निर्माण झाला.वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून परिमल झाडे याने वैभव आळे याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला.
घटनेनंतर गावकऱ्यांनी जखमी वैभव आळे याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र जखम गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. वैभव वर शस्त्रक्रिया करताना सोमवारी सकाळी ५.०० वाजता दरम्यान प्राणज्योत मावळली.
घटनेची माहिती गोंडपिपरी पोलिस ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पीएसआय मंगेश कराडे यांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान हल्ला करणारा आरोपी परिमल झाडे हा फरार असून गोंडपिपरी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आरोपी परिमल याच्यावर गुन्हा नोंद केला असून युद्धपातळीवर आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. मृतक वैभव आळेच्या पश्चात आई,वडील,लहान भाऊ असा आप्त परिवार आहे.



