जलसंवर्धनासाठी लोकसहभाग अत्यावश्यक – आ. जोरगेवार
जलजागृती सप्ताहात जलप्रतिज्ञा; पाणी बचतीचा संदेश, पाटबंधारे विभागाचा पुढाकार

चांदा ब्लास्ट
पाणी हे जीवनाचे मूळ आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी पाण्याचा साठा सुरक्षित ठेवायचा असेल, तर आजपासूनच त्याचे जतन, संवर्धन आणि योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. जलसंवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृती पंधरवाडा २०२६ निमित्त चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ तसेच पाटबंधारे विभाग, चंद्रपूर यांच्या वतीने आज बुधवारी दिशा विश्रामगृह येथे आयोजित जलजागृती सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता प्रा. जोड, कार्यकारी अभियंता प्रसाद पठारे, अधीक्षक अभियंता अमोल वसूलकर, जलेश सिंह तसेच नामदेव राहुडे यांची उपस्थिती होती.
यावेळी ते पुढे म्हणाले की, पाण्याचा अपव्यय थांबवणे, पावसाचे पाणी साठवणे, जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि पाण्याची स्वच्छता राखणे ही काळाची गरज आहे. समाजातील प्रत्येक घटकाने ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ हा मंत्र अंगीकारला, तरच भविष्यातील जलसंकट टाळता येईल, असे ते म्हणाले.
लोकसहभागातून जलसंवर्धनाबाबत जनजागृती करणे आणि पाण्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थितांनी एकत्र येत जलप्रतिज्ञा घेत पाणी बचत, पाण्याचा अपव्यय टाळणे तसेच जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला.



