ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव : चंद्रपूरच्या प्रतिभेला नवे पंख देण्याचा प्रयत्न – आ.  जोरगेवार

पडोली येथे ‘आमदार चषक २०२६’ भव्य कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ; रील स्टार साहिल कडक यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट

श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून चंद्रपूरच्या खेळाडूंना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. ग्रामीण भागातील असंख्य गुणी खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता असून, योग्य संधी आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांची प्रतिभा अनेकदा दडपली जाते. हाच विचार लक्षात घेऊन बॉडी बिल्डिंग, कबड्डी, कुस्ती, क्रिकेट, हँडबॉल यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून, या माध्यमातून चंद्रपूरच्या प्रतिभेला नवे पंख देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवांतर्गत पडोली येथील खुटाळा येथे “आमदार चषक २०२६” या पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विनोदी रील स्टार साहिल कडक यांची विशेष उपस्थिती लाभली. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महामंत्री रवी गुरुनुले, मनपा नगरसेविका आशा देशमुख, सायली येरणे, घुग्घूस नगर परिषदचे नगरसेवक आशिष मासिरकर, नकुल वासमवार, प्रविण सिंग, राकेश पिंपळकर, राशिद हुसेन, नितीन साळवे, दयानंद साखरकर, आशिष वाढई, रुपेश झाडे, दिनेश कोईचारे, प्रकाश तुमाने, साहिल चहारे, अजय काजवले, ऋषभ दुपारे, सुमित बेले, प्रलय मशखेतरी, जय मिश्रा, केशव वाघाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, या क्रीडा महोत्सवाचा उद्देश केवळ स्पर्धा घेणे नसून, चंद्रपूरमधील खेळाडूंना घडवणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे हा आहे. या मंचाच्या माध्यमातून उद्याचे उत्कृष्ट खेळाडू घडावेत आणि आपल्या जिल्ह्याचा गौरव वाढवणारे प्रतिभावान युवक-युवती तयार व्हावेत, हा आमचा प्रयत्न आहे.

क्रीडा ही केवळ शरीरसौष्ठव वाढवणारी गोष्ट नसून, ती जीवनाला दिशा देणारी शक्ती आहे. त्यामुळे अशा उपक्रमांद्वारे निरोगी, शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासू समाज घडवण्याचा प्रयत्न होत आहे. खेळ आणि क्रीडा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ते जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत. क्रीडेमुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न राहते आणि जीवनात शिस्त व आत्मविश्वास निर्माण होतो.कबड्डीसारख्या खेळामुळे संघभावना, धैर्य, निर्णयक्षमता आणि संघर्ष करण्याची ताकद विकसित होते. अशा स्पर्धांमुळे समाजात एकता, बंधुभाव आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असेही ते म्हणाले.

सदर कबड्डी स्पर्धा तीन दिवस चालणार असून, यात १६ संघांनी सहभाग घेतला आहे. पुरुष गटात ५७ व ७० किलो वजन गट, तर महिला गटात ५५ किलो व खुल्या (ओपन) गटात स्पर्धा घेण्यात येत आहे.

साहिल कडक यांची उपस्थिती ठरली आकर्षणाचे केंद्र

या कार्यक्रमाला विनोदी रील स्टार साहिल कडक यांची विशेष उपस्थिती लाभली.तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या साहिल कडक यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत लाभली, युवकांमध्ये क्रीडाप्रती अधिक उत्साह आणि ऊर्जा निर्माण झाल्याचे दिसून आले. आयोजकांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये