पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन व कंपन्यांकडून उपाययोजना
अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल /डिझेल संपल्याबाबत अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये अनावश्यक भीती व गोंधळ निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, चंद्रपूर शहरातील तसेच जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा व नियमित साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची पेट्रोल /डिझेलची टंचाई निर्माण झालेली नाही. पेट्रोल /डिझेल इंधनपुरवठा साखळी सुरळीतपणे कार्यरत आहे व यावर संबंधित यंत्रणेमार्फत सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे.
नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन : 1) कोणत्याही अफवा, सोशल मिडीयावरील चुकीचा संदेश किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. 2) नाहक भीतीपोटी इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न करू नये किंवा एकाच वेळी जास्त प्रमाणात पेट्रोल /डिझेल खरेदी करू नये. 3) पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळावी व वाहतूक कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्था विषयक परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. 4) इंधनपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन व संबंधित कंपन्यांकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे, यावर विश्वास ठेवावा. 5) अफवा पसरविणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे, हा कायद्याने दंडनीय अपराध असून अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. 6) कोणतीही शंका असल्यास अधिकृत शासकीय माध्यमांद्वारेच माहिती घ्यावी.
नागरिकांनी शांतता संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.



