ब्रम्हपुरीतील मुख्य महामार्गावर गतिरोधक बसवावेत
भाजप युवा मोर्चाची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :_ शहरातील देलणवाडी वॉर्डपासून इंदिरा गांधी चौक ते रेल्वे फाटक या राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीच्या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने या मार्गावर तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, ब्रम्हपुरी शहराच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात ब्रम्हपुरीचे मा. तहसीलदार श्री. मासाळ यांना निवेदन सादर करण्यात आले.सदर मार्गावर काही दिवसांपूर्वी दोन गंभीर अपघात घडले असून, अपघातांची मालिका सुरूच राहण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.ब्रम्हपुरी शहर हे ग्रामीण भागासाठी मध्यवर्ती ठिकाण असून, या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी तसेच दुचाकी, चारचाकी व जड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. वाहनांचा वाढता वेग आणि वर्दळ यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवून वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणावे व अपघातांना आळा घालावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रा. डॉ. सुयोगकुमार बाळबुधे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तनयजी देशकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित रोकडे, माजी नगरसेवक मनोज वठे, भाजप महामंत्री स्वप्नील अलगदेवे, युवा मोर्चा उपाध्यक्ष बंटी येरावर, सचिव निखिल प्रधान, केतन पेशने, राहुल शुभेदार, कृष्णा मेहेर, दीपक कावळे, मोहित कावळे,आदित्य लोखंडे तसेच भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



